पुणे – ज्यांना पंधरा वर्षे भोंग्याचा त्रास झाला नाही, त्यांना भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर त्रास सुरू झाला आहे.राज्याचा मुख्यमंत्री शिवसेना ठरवेल. त्यांनी विरोधीपक्ष नेते म्हणून काम करावे, अशी राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत दोन दिवसात आरोपपत्र दाखल होऊन पुढील पाच दिवसात सोमय्या जेलमध्ये जाणार असल्याचे सांगत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
शिवसेना हडपसर मतदारसंघाच्या वतीने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली माळवाडी रोड येथे जाहीर मेळाव्याचे आयोन केले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना खासदार राऊत बोलत होते.
शिवसेना नेत्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, संपर्क प्रमुख सचिन आहीर, आदित्य शिरोडकर, शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री विजय शिवतरे, , संजय मोरे, समीर तुपे, राजेंद्र बाबर, नगरसेवक प्रमोद भानगिरे, प्राची अल्हाट, संगिता ठोसर, पल्लवी जावळे, पृथ्वीराज सुतार, माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, जिल्हा प्रमुख विजय देशमुख, रमेश कोंडे, बाळासाहेब चांदेरे शंकरनाना हरपळे, राजाभाऊ होले, तानाजी लोणकर, प्रा. विद्या होडे, शादाब मुलाणी, महेंद्र बनकर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी माळवाडी येथील शिवसेना कार्यालयाचे खासदार राऊत यांच्या हस्ते उद्घाटन झाले.खासदार राऊत म्हणाले, ‘स्वत: शेण खायचे आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा ही वृत्ती जोपसणारे आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. मात्र, आम्ही त्याला घाबरत नाही. ठाकरे सरकार कोरोनापासून सर्व आजारांवर उपचार करणारे आहे. हा महाराष्ट्र बहुजन समाजाचा आहे, छत्रपती शिवरायांचा, शाहु, फुले, आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरेंचा आहे. शिवसेनेचा प्रवास गल्ली ते दिल्ली आहे. शिवसैनिकाच्या खांद्यावरील भगवा हा बाळासाहेबांनी दिलेला ओरिजनल आहे. व्यंगचित्रांच्या कुंचल्याच्या फटकाऱ्याने मराठी माणसाला न्याय देण्याचे काम केले.
आज लोक पेटवापेटवीची भाषा करतात. सवाल यह है की बंदर के हात माचिस किसने दी? पण कसे काय पेटणार त्यासाठी आतून आग आणि मनगटात रग असावी लागते. हा महाराष्ट्र आंडू पांडुंचा नाही तो शिवसेनेचा आहे.
भोंग्याचे राजकारण सध्या सुरू आहे. बाळासाहेबांनी मुस्लीम बांधवांसाठी जागा उपलब्ध करून देत रस्त्यावरील नमाज बंद केले.
आपण जेंव्हा समस्या निर्माण करता तेंव्हा त्यावरील उपायही देणे गरजेचे आहे. भोंगे प्रकरणात या लोकांनी आमच्या हिंदूंचाच गळा आवळला आहे. औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला, हे लोकांना सांगा. आयोध्येत बाबरी पाडण्याचे काम शिवसैनिकांनी केले. आमच्याकडे छत्रपती आणि तुमच्याकडे औरंगजेब जन्मला आहे हे विसरू नका. आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्र झुकणारा नाही. शिवसेनेला संपविण्याच्या दिल्लीतून सुपाऱ्या दिल्या जातात. महापालिकेच्या पायरीवर आमची मनगटे कमी नाहीत हे शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. पालिका निवडणूकीचा संदर्भ देत खासदार राऊत यांनी आता केवळ मुंबई, ठाणे नाही तर पुणेही जिंकायचे आहे. सावधपणे पावले टाकण्याची गरज आहे, अशी सूचनाही शिवसैनिकांना दिली.
डॉ. निलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे महाराष्ट्र अस्वस्थ करीत आहेत. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणतात आदित्य ठाकरे हे मर्चिडीस बेबी आहे. त्यांचे म्हणणे असे असेल तर तुमचा हडपसर येथील एक माणूस मर्चिडीस चोर आहे.
समीर तुपे यांनी प्रास्ताविक केले तर नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी आभार मानले.