नवव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्घाटन
पुणे : “चांगल्या समाजासाठी बंधुतेचा विचार रुजण्याची, नैतिक मूल्यांच्या शिक्षणाची गरज आहे. हा विचार व शिक्षण तळागाळातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेचे रोप लावले. त्यांच्या अद्वितीय कार्यामुळे आज शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यांत वाहत असून, लाखो मुलांनी चांगले शिक्षण घेऊन स्वावलंबी होत देशाचे नाव उज्वल केले. अशा संस्कारक्षम, नैतिक मूल्यांच्या शिक्षणाची शिदोरी सामान्यांना उपलब्ध करून देणाऱ्या कर्मवीरांना भारतरत्न द्यावा,” असे प्रतिपादन नवव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. के. जी. कानडे यांनी केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेच्या मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी कानडे बोलत होते. बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे, शंकर आथरे, स्वागताध्यक्ष भीमाशंकर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, निमंत्रक बाळासाहेब गार्डी आदी उपस्थित होते. शंकर आथरे लिखित ‘काव्यांचल’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. गुजरात येथील कवी शिवानुज यांना ‘बंधुता शब्दक्रांती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
डॉ. के. जी. कानडे म्हणाले, “बंधुता परिषदेचा ‘गर्व से कहो हम बंधू है’ हा विचार प्रभावित करतो. या वाक्याचा भाव समाजातील सर्वांना अभिप्रेत आहे. पंढरीच्या वारीप्रमाणे ही बंधुतेची वारी आहे. शंभर वर्षांपूर्वी कर्मवीरांनी माणूस घडवण्याचे कार्य सुरु केले. तसेच कार्य बंधुताचार्य रोकडे यांच्या हातून होत आहे. समाजाला बंधुतेचा, समतेचा विचार तारणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये हा विचार रुजवला पाहिजे. तेच काम रयत शिक्षण संस्था करतेय. आधुनिक शिक्षणाला संस्कारांची, नैतिकतेची, मूल्यांची जोड देत आदर्श समाज घडविण्याचे दायित्व आपण पार पाडले पाहिजे.”
बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “जात-धर्म विरहित बंधुतेचा विचार जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न गेली चार दशके करत आहे. भवतालची परिस्थिती पाहताना लोकशाही पायदळी तुडवण्याचा प्रयत्न होतोय. लोकशाहीच्या मूल्यांचे अवमूल्यन थांबवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. भारतीय संविधानाचे रक्षण, लोकशाहीचे जतन करण्यासाठी मूल्याधिष्ठित समाज घडवावा लागेल. त्यासाठी विद्यार्थ्यांत स्वातंत्र्य, समता, बंधुता या विचारांची पेरणी गरजेची आहे. हे संमेलन विद्यार्थी-शिक्षक घडवणारी कार्यशाळा आहे.”
शंकर आथरे, प्रा. डॉ. अरुण आंधळे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. बाळासाहेब बेंडे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. संगीता झिंजूरके यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब गार्डी यांनी आभार मानले.