पुणे- एका लोकप्रतिनिधीनं बालगंधर्व पाडून त्याचा पुनर्विकास करण्याची स्वतःला खूप चांगली वाटणारी योजना मंजूर करवून घेतली , दीपक मानकर यांनी हे बालगंधर्व पाडू देणार नाही असा ढोस पाजल्यावर काही काळ रेंगाळलेल्या या योजनेने आता मानकर यांना मोका खाली आत घातल्यावर पुन्हा डोके वर काढले आहे .एकीकडे तिकडे शेक्सपिअरचं घर शेकडो वर्ष जतन केलं जातं आणि दुसरीकडे आपल्या इथे पुलंच्या जन्मशताब्दी वर्षात बालगंधर्व पाडण्याचा घाट घातला जातोय . बालगंधर्व दुरूस्त करण्यास कोणाचीच हरकत नव्हती. पण आता पुणेकरांना बालगंधर्व च्या ऐतिहासिक वास्तूची पडझड उघड्या डोळ्यांनी पहावी लागते कि काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे .
त्याबाबत आजच्या सकाळ मध्ये महापालिका प्रशासनाने हि जाहिरात दिली आहे पहा …
यामुळे बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याची हालचाल आता सुरु झाल्याचे स्पष्ट झाले आहे.मात्र यामुळे असंख्य रसिकांच्या ,पुणे प्रेमी नागरिकांच्या भावना उफाळून येणार आहेत .
स्वतः पु.ल. देशपांडे यांनी देखरेख करून उभे केलेले बालगंधर्व रंगमंदीर पुलंच्याच जन्मशताब्दी वर्षात पाडणे हा धक्का अनेकांना बसणार आहे.सांस्कृतिक ठेकेदार असल्याचा आव आणणारेच संस्कृती मारण्यासाठी सज्जझाल्याचे यावरून दिसून येते आहे . वरून सांस्कृतिकचा आव आणत असले तरी वाढीव एफएसआयची अनावर ओढ यामागे असल्याचे लपून राहणारे नाही.सांस्कृतिक वगैरे ढोंग मांडून सर्वकाही मेट्रोच्या सोईसाठी आणि कंत्राटं काढण्यासाठी हे चाललंय. असा आरोप होतो आहे.
त्यामुळे यांनी बालगंधर्व पाडलं तर यांना प्रत्येक निवडणूकीत पाडा अशी आवाहने देखील आता होऊ लागतील . बालगंधर्व वाचवण्यासाठी आता दीपक मानकर जरी येवू शकले नाहीत तरी असंख्य पुणेकर रस्त्यावर उतरतील आणि तेव्हाच पुण्याचा सांस्कृतिक अभिमान जिंकतो की सत्तेची मस्ती जिंकते ते स्पष्ट होईल असे दिसते आहे.
आज सकाळ मध्ये महापालिका प्रशासनाने दिलेलेया जाहिरातीनुसार ,बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडून तिथे सर्व सुविधांनी युक्त असे बहुमजली रंगमंदिर संकुल उभारण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचे आराखडे महापालिकेने वास्तुविशारदांकडून मागविले आहेत. त्यामुळे नव्या वर्षांत बालगंधर्व रंगमंदिर पाडले जाणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
कलाकार, रंगकर्मी, तंत्रज्ञ आणि प्रेक्षकांच्या सोयीचा विचार करून ज्यांनी बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू साकारली ते महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षांतच महापालिकेने या पुनर्विकासाच्या प्रक्रियेला प्रारंभ केला असून बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाला तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात शहरातील सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन देण्याबरोबरच कलादालने-नाटय़गृहांच्या नूतनीकरणावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्याचे निश्चित करण्यात आले होते. बालगंधर्व रंगमंदिराची सध्याची वास्तू पाडून तेथे सुसज्ज नवी इमारत बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. महापालिकेने आता प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केल्यामुळे बालगंधर्व रंगमंदिर पाडले जाणार, ही गोष्ट अधोरेखित झाली आहे.
बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्याचे निश्चित करून त्याबाबतच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला महापालिकेकडून सुरूवात करण्यात आली आहे. पुनर्विकासाचे प्रस्ताव सादर करू इच्छिणाऱ्या वास्तुविशारदांनी १० ते २४ डिसेंबर या कालावधीत नोंदणी करावी, असे महापालिकेच्या भवन रचना विभागाकडून जाहीर करण्यात आले असून पुनर्विकासाचे आराखडे सादर करण्यासाठी २१ जानेवारी २०१९ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
शहराचे वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे भूमिपूजन ८ ऑक्टोबर १९६२ रोजी बालगंधर्व यांच्या हस्ते झाले. त्यानंतर २६ जून १९६८ रोजी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते रंगमंदिराचे उद्घाटन झाले. महापालिकेच्या वतीने रंगमंदिराचे नूतनीकरणही काही वर्षांपूर्वी करण्यात आले होते