पुणे : पोलिसांची भीती मनात बाळगू नका. तुम्हाला कोणत्याही अडचणी आल्या तर पोलीस काकांशी किंवा पोलीस ताईंबरोबर तुम्ही बिनधास्त बोलू शकता. कोणती अडचण आली तर तात्काळ पोलिसांशी कसा संवाद साधायचा अशा गप्पा गोष्टींमधून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी पोलीस काका व पोलीस ताईंबरोबर मैत्री केली. यावेळी बंदुक, वॉकी टॉकीचा वापर कसा व कोणत्या प्रसंगी केला जातो याची माहिती पोलिसांनी दिली.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही वसंतदादा पाटील हायस्कूल मनपा शाळा क्रमांक १ मध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, शिक्षण उपसंचालक प्रसाद काळंगावकर, शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल भरेकर, मुख्याध्यापिका शालिनी सोनावणे, पोलीस कर्मचारी दिलीप मोहिते, सोमनाथ ढगे, सचिन माळी, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, सेवा मित्र मंडळ ट्रस्टचे शिरीष मोहिते, विक्रांत मोहिते, अमर लांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन उमेश कांबळे, रोहन जाधव, अॅड. हेमंत झंझाड यांनी केले. विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल, रेवडी व शालेय पुस्तकांचा संच देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच दामिनी पथकाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
सतीश गोवेकर म्हणाले, शाळा शिकताना जीवनाचा आनंद देखील तुम्ही घ्या. प्रत्येकाने मोठा अधिकारी किंवा डॉक्टर, इंजिनियर झाले पाहिजे असे नाही. तर, तुम्ही चांगले नागरिक झालात तरी देखील देशाला पुढे नेऊ शकता. नेहमी तुम्हाला यश मिळतेच असे नाही, अपयश पचवण्याची ताकत देखील तुमच्याकडे असली पाहिजे. अपयश आले म्हणून खचून न जाता त्यातून प्रेरणा घेऊन पुढे जाता आले पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले.
श्रीहरी बहिरट म्हणाले, शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतो. शिक्षणाचा पाया मजबूत झाला, तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात मजबूतपणे उभे राहू शकता. पोलीस हे तुमच्या सुरक्षेसाठी आहेत, त्यामुळे कोणतीही अडचण आली तर न घाबरता त्यांच्याशी संवाद साधा. हल्ली मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती कमकुवत होत आहे. त्यामुळे मोबाईलच्या वापराची जिज्ञासा ही चांगली आहे का, की आपला पाल्य वाईट मार्गाला जात आहे याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. प्रसाद काळंगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विक्रांत मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष मोहिते यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल भरेकर यांनी आभार मानले.