पुणे :गेली ६ वर्षे २४ तास समान पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली वाढीव पाणीपट्टी वसूल करणाऱ्या महापालिकेकडून अजूनही बाणेर, पाषाण, सूस- म्हाळूंगे गावांना पुरेसा पाणी पुरवठा केला जात नाही. याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही दूर्लक्ष केले जात आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपाचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली चांदणी चौक येथील पाण्याच्या चौकोणी टाकीवर निषेध आंदोलन करण्यात आले. एकीकडे वारजे त पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत असताना बाणेर बालेवाडी हि सुटलेली नाही. दुसरीकडे हडपसर ,महंमदवाडी या परिसरासह दक्षिण पुण्याच्या अनेक भागात अजूनही महापालिका दिवसा आड ३ /४ तासाचा पाणीपुरवठा करत आहे .
दरम्यान आजच्या आंदोलन समयी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धरणात पाणी असताना केवळ प्रशासकीय नियोजन नसल्याने पाणी मिळत नसल्याने या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तसेच जो पर्यंत पुरेसे पाणी मिळत नाही तो पर्यंत या टाकीवरून उठणार नसल्याचे यावेळी अमोल बालवडकर यांनी सांगितले. भाजपचे पदाधिकारी गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर , शशिकांत बालवडकर यांच्यासह बाणेर-बालेवाडी भागातील नागरिक तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी बाणेर-बालेवाडीला जाणाऱ्या पाण्याचा व्हॉल्व फिरवित पाणीही सोडले. तसेच यावेळी नंदीबैलही पाण्याच्या टाकीच्या परिसरात आणत हलवी वाजवित प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
यावेळी बोलताना बालवडकर म्हणाले की, गेल्या पाच वर्षात आम्ही पाण्यासाठी वेगवेगळया योजना केल्या. त्यानंतर आम्हाला लॉकडाऊनमध्ये ही पुरेसे पाणी मिळत होते. तर डिसेंबर 2021 नंतर पाणी मिळण्यात पुन्हा समस्या निर्माण झाल्या तर प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर पाणीच येत नाही. तर यंदा धरणे 100 टक्के भरलेली असूनही पाणी मिळत नाही. अधिकारी सांगतात टाक्या भरल्या नाहीत, विजेचा प्रॉब्लेम आहे, कर्मचारीच नाहीत अशी कारणे देत पाणी सोडले जात नाही. मात्र, प्रत्यक्षात ही समस्या केवळ प्रशासकीय नियोजन नसल्याने होत असून तातडीनं ही समस्या सुटावी या मागणीसाठी हे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून इथेच बसणार असल्याचे ते म्हणाले.
तर, प्रशासन वारजे जलकेंद्र तसेच इतर जलवाहिन्यांची कारणे पाणी सोडत नसून जाणून-बुजून बाणेर बालेवाडीला पाणी कमी देत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या मनमानीचा निषेध ठिय्या आंदोलन करत केला जाणार असून नागरिकांनीही त्यात सहभागी व्हावे असे आवाहन कळमकर यांनी केले आहे.