पुणेः- गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावाटामुळे कोणीही मुक्तपणे व्यक्तीगत आणि सामुहिक जीवन जगू शकले नाही आणि अनुभवू शकले नाही. त्यामुळे यावर्षी सर्व सार्वजनिक महोत्सवांना थोडी मोकळीक देण्यात आली आहे. परंतु, सणवार साजरे करण्यासाठी दिलेल्या मोकळीकीचा समतोल ढळतो आहे की काय असे वाटते आहे. नागरिकांनी दिलेल्या मोकळीकीचा असमतोल होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. अन्यथा हा असमतोल वाढल्यास समतोल सांभाळण्यासाठी पु्न्हा बंधने आणणे क्रमप्राप्त ठरू शकते, असे मत राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आम्ही कोथरूडकर आयोजित आणि संवाद पुणे निर्मित कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे उद्घाटन आज राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध गायक पं. आनंद भाटे, संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, भारतीय जनता पक्षाचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे, मंजुश्री खर्डेकर, संदिप खर्डेकर,अॅड. मंदार जोशी, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, कांचन कुंबरे, शिवराम मेंगडे, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोनाच्या सावटातून बाहेर पडण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची वारंवारता वाढविण्यावर आमचा भर आहे.सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी पुरेसा खर्च केला पाहिजे. राज्या-राज्यात, शहराशहरात कलाकारांच्या कलेचे आदान-प्रदान वाढवून कलाकारांची खाण वृद्धिंगत करायला पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील महाजन यांनी केले, तर अॅड. मंदार जोशी यांनी आभार मानले.
प्रारंभी शिल्पा दातार आणि सहकाऱ्यांनी गणेश वंदना सादर केली. तर श्रृंगाली परांजपे आणि सहकाऱ्यांनी जयोस्तुते हे गीत सादर केले. तसेच चित्रपट अभिनेत्री डॉ. तेजा देवकर आणि वैशाली जाधव यांची कथ्थक आणि लावणीची जुगलबंदी रसिकांची दाद घेऊन गेली. यानंतर नाट्यरंग या कार्यक्रमात पं. आनंद भाटे यांचे नाट्यसंगीत आणि अभंग ऐकण्याची संधी रसिकांना मिळाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.