पुणे : कोरोनाच्या त्रिसूत्रीच्या नियम पालनाचे बंधन घालून त्वरित शुभकार्यातील उपस्थितीचे हे बंधन शिथिल करावे अशी मागणी पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे क्रिएटिव्ह फाउंडेशन अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी एका निवेदानाव्दारे केली आहे.
या निवेदनात खर्डेकर यांनी असे म्हटले आहे कि,’आता संपूर्ण राज्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मॉल, दुकाने, शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळ,बाजार, चित्रपटगृह, नाट्यगृह सगळेच खुले होत आहे आणि मुक्त वातावरणात सामान्य नागरिक श्वास घेत असून कोरोनाच्या संकटातून मुक्त होत सर्वत्र नवचैतन्य संचारत आहे. अश्या परिस्थितीत एखाद्या व्यक्ती च्या जीवनात एकदाच येणार्या आनंदाच्या क्षणांना मात्र बंधन घालण्यात आले आहे. मग तो विवाह समारंभ असो किंवा साखरपुडा, बारसं असो वा डोहाळजेवणं, मंगळागौर यासारखे कार्यक्रम मात्र 100 किंवा 200 लोकांच्या उपस्थितीत बंधनकारक करणे हे अन्यायकारक असून सर्वकाही नॉर्मल होत असताना हे उपस्थिती चे बंधन देखील शिथिल करणे गरजेचे आहे. एखाद्या आनंदाच्या प्रसंगाला 100/200 ची जरी अट असली तरी कमी उपस्थितीत, कार्यालय भाड्यासह भोजनाच्या दरापर्यंत सर्वच महाग पडत आहे.