पुणे- विधानभवनातील बैठकीत उपमुख्यमंत्र्यांशी बोलूनही उपयोग झाला नाही, काल इशारा देऊनही कोणी हलले नाही तेव्हा आज अखेर पुण्याचे खासदार गिरीश बापट आपल्या वयाच्या ७० व्या वर्षीही कोरोनाच्या महामारीच्या काळात रिक्षाचालकांच्या संसाराला काडीचा तरी आधार द्या म्हणून पोलिसांचा विरोध झुगारून आर टी ओ च्या पायऱ्यांवर ठिय्या मारून बसले होते.
सरकारला जाग यावी ,रिक्षाचालकांसाठी आपण पाठविलेले पैसे रिक्षाचालकांपर्यंत पोहोचलेले नाहीत ,बाबुगीरीच्या कारभाराने ढिसाळपणाचे शिखर गाठले आहे , हे समजावे ,आणि गरीबाच्या संसाराला काडीचा तरी आधार मिळावा म्हणून आपण १९ संघटनांचे प्रतिनिधी यांना संपर्क करून परिस्थिती जाणून घेऊन हा मार्ग पत्करला असल्याचे खा. बापट यांनी सांगितले करोना महामारीमुळे संपूर्ण बाजार पेठ ठप्प झाली असून त्यामुळे हातावर पोट असलेल्या लोकांचे जगणे मुश्किल झाले. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महिन्याभरापूर्वी एक पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यामध्ये रिक्षाचालकांना १५०० रुपये अर्थसहाय्य मदत दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली. मात्र अद्यापही कोणाच्याही खात्यात ती रक्कम जमा न झाल्याने आज आम्ही आरटीओ कार्यालयाच्या पायर्यांवर मूक आंदोलन करीत आहोत, सरकारने या घटकाला लवकरात लवकर मदत द्यावी,” अशी मागणी यावेळी त्यांनी केली.