उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे- सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील दरवर्षी निर्माण होणारी पूर परिस्थिती रोखण्यासाठी आणि पाणी साठ्याचे नव्याने नियोजन करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या वेळी अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालय पुणे आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे तज्ञांनी केलेले संशोधन, त्यांची निरीक्षणे आणि कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा आढावा अजित पवार यांनी या बैठकीत घेतला. हि पूर परिस्थिती रोखण्यासाठी पाणी साठ्याचे नव्याने नियोजन करावे लागणार आहे. या विषयी जलसंपदा मंत्री मा. जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून उपाययोजना निश्चित केल्या जातील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी सांगितले. यावेळी कृष्णा खोरे, पूर आणि उपाययोजना संदर्भात तज्ञांनी सादर केलेल्या अहवालाचे सादरीकरण या बैठकीत करण्यात आले. शिवाय तज्ञांनी सुचविलेल्या उपाययोजनांवर बैठकीत चर्चा देखील करण्यात आली. कृष्णा नदीला येणाऱ्या पुरामध्ये कोयना, राधानगरी या धरणाच्या सांडव्याचा विसर्ग सुमारे ३० ते ४० टक्के असतो धरणामध्ये पावसाळ्यात तारखेनुसार किती पाणी पातळी राखावी याबाबत नव्याने नियोजन करणे आवश्यक आहे असे सांगून कोयना धरणाच्या पाणी पातळीबाबत तयार केलेले वेळापत्रक दीपक मोडक यांनी सादर केल. या बैठकीसाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, धरण पुनर्स्थापना समिती पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपक मोडक, डॉ.पद्माकर केळकर, डॉ. सुधीर आगाशे, डॉ. भालचंद्र बिराजदार, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड, संस्थेचे सहसचिव ॲड. संदीप कदम, ॲड. भगवानराव साळुंखे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे, प्रा. गणेश कोंढाळकर, प्रा. कमलेश जेठा, प्रा. अभय शेलार, डॉ. नागनाथ बनसोडे, प्रा. दिगंबर पवार आणि जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाविद्यालयाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतल्याने समाजामधील विविध स्तरामधून समाधान व्यक्त होत आहे.