वस्तू व सेवा कर विभाग महाराष्ट्र आणि पुणे व्यापारी महासंघ यांच्या वतीने विशेष कार्यक्रम
पुणे : कोरोना महामारीच्या काळात व्यापाऱ्यांचे खूप नुकसान झाले. यामध्ये लहान आणि मध्यम व्यापारी यांचे अधिक नुकसान झाले. या गोष्टीचा विचार करून शासनातर्फे अभय योजना राबविण्यात येत आहे. व्यापारी वर्गावर थकबाकीचा जो अनावश्यक दबाव आहे. तो काढण्यासाठी ही योजना राबविली जात आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्य जीएसटी आयुक्त राजीव मित्तल यांनी केले.
वस्तू व सेवा कर विभाग महाराष्ट्र शासन आणि पुणे व्यापारी महासंघ यांच्या वतीने थकबाकी मुक्तीसाठी राबविण्यात येणारी अभय योजनेच्या माहितीसाठी आणि पुण्यातील व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन टिळक रस्त्यावरील नीतू मांडके सभागृहात करण्यात आले होते. यावेळी मित्तल यांनी पुण्यातील व्यापाऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी वस्तू व सेवा कर विभाग पुणेचे प्रमुख धनंजय आखाडे, प्रमोद भोसले, राजेंद्र अडसूळ, पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया, उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक ,रतन किराड ,मिठालाल जैन ,मंगेश भालेराव ,प्रमोद शहा ,नितीन काकडे ,राजेश शेवानी ,संजय तांबोळी ,हनीफ जाफरानी , कुमार भोगशेट्टी ,मनोज शाह ,अमित मुणोत, अरविंद सोळंकी ,कुरेश घोडनदीवाला उपस्थित होते.
व्हॅट, बीएसटी, सीएसटी.इत्यादी कायद्यांच्या थकबाकीतून मुक्तता होण्यासाठी शासनाने अभय योजना राबविली आहे. यासंदर्भात व्यापार्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.
राजीव मित्तल म्हणाले, व्यापाऱ्यांसाठी सप्टेंबरपर्यंत ही अभय योजना राबविण्यात येईल. परंतु व्यापाऱ्यांनी वेळेच्या आधीच या योजनेचा लाभ घ्यावा. अफवा आणि गैरसमजुतीला बळी पडू नये असेही त्यांनी सांगितले.
धनंजय आखाडे म्हणाले, पुणे व्यापारी महासंघामध्ये ८३ व्यापारी संघटना आहेत. जास्तीत जास्त व्यापाऱ्यांना अभय योजनेची माहिती मिळावी आणि ते थकबाकीमुक्त व्हावे यासाठी शासनातर्फे योजना राबविण्यात येत आहे. याचा लाभ व्यापार्यांनी अवश्य घ्यावा कारण अशी योजना यापूर्वी देखील कधी आली नव्हती आणि यानंतर देखील येणार नाही. मागचे काहीतरी राहिलय या भावनेतून बाहेर पडण्यासाठी ही योजना आहे. जीएसटी आयुष्यभर चालणारा आहे. कोरोनामुळे अनेक व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
सूर्यकांत पाठक म्हणाले, शासनाने आणलेल्या अभय योजनेचे व्यापारी निश्चितपणे स्वागत करतील, परंतु यामध्ये प्रामुख्याने प्रामाणिक व्यापाऱ्यांवर जो अन्याय आहे तो दूर झालेला नाही. विक्रेत्याने खरेदीदाराला माल दिल्यावर खरेदीदाराने विक्रेत्याला पूर्ण पेमेंट जीएसटी सह केले असताना काही अप्रामाणिक व्यापारी जीएसटी भरत नाहीत आणि त्याची वसुली मात्र पुन्हा खरेदीदाराकडून होते हा खुप मोठा अन्याय आहे. ही त्रुटी कुठेही दुरुस्त करण्यात आली नाही.
महेंद्र पितळीया म्हणाले, अभय योजनेमध्ये जे व्यापारी सामील होऊन पैसे भरतील तो बोजा खरेदीदारांकडून कमी होणार आहे त्यामुळे योजनेमधून नेमके किती पैसे समोरच्या विक्रेत्यांनी भरले आहेत हे खरेदीदाराला कळल्याशिवाय त्याच्यावर असलेले कराचे ओझे त्याला कळणार नाही, असेही पितळीया यांनी नमूद केले. अभिजित देशपाडे यांनी सूत्रसंचालन केले. महेंद्र पितळीया यांनी स्वागत केले. मनोज सारडा यांनी आभार मानले.