पुणे- शहराची पाण्याची वाढती गरज लक्षात घेवून मुळशी धरणातील ५ टीएमसी पाणी पुणे शहराला मिळणेची तरतूद करावी अशी मागणी काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागूल यांनी केली होती. यावर विचार विनिमय करणेसाठी संबंधित अधिका-यांची बैठक विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज दि.१७/२/२०२० रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव, काँग्रेस गटनेते आबा बागूल, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.खेमनार, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख श्री.पावसकर, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता श्री.धोडपकर व पुणे मनपा कार्यकारी अभियंता श्रीमती शेकटकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त यांनी खडकवासला प्रकल्पातून पुण्यासाठी पाणी उचलले जात असून भामा आसखेड मधून देखील आता पाणी पुण्यास मिळत आहे, पुण्यास मुळशी धरणातील पाणी आपण वळवू शकलो तर पुणे शहराला दिलासा मिळू शकेल. पाणी उपलब्ध असून मिळत नाही अशी नागरिकांमध्ये भावना असते, याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. हा विषय आबा बागूल यांंच्या पुढाकाराने आज आला असून या विषयास चालना मिळाली आहे.
पुणे शहराची पाण्याची वाढती गरज लक्षात घेवून मुळशी धरणातून ५ टीएमसी पाणी पुणे शहराला पुरविणे शक्य आहे काय या संदर्भात पुणे महानगरपालिकेने राज्याच्या जलसंधारण विभागाच्या सहायाने प्रकल्प अहवाल तयार करून सविस्तर विषयपत्र तयार करून राज्य शासनास सूपूर्द करावे. त्यामध्ये प्रकल्पातील व्यवहार्यता, कायदेशीर बाबी, आर्थिक तरतूद व खर्चाचे नियोजन या सर्वांचा तपशिल असावा, अशी सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात या संदर्भात झालेल्या बैठकीत संबंधित अधिका-यांना दिली अशी माहिती पुणे महानगरपालिका काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागूल यांनी सांगितली.
सुमारे तासभर चालू असलेल्या बैठकीमध्ये माहिती देताना आबा बागूल यांनी सांगितले की, पुण्याचा विस्तार मोठया वेगाने होत आहे. आगामी काही वर्षांमध्ये पुण्याची लोकसंख्या १ कोटीच्या आसपास जाणार अशी शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. अशा वेळी पुण्याची वाढती पिण्याची पाण्याची गरज पूर्ण करणेसाठी आत्ताच नियोजन करणे आवश्यक आहे. एक ते दोन वर्ष पाऊस नाही पडला तर भयानक परिस्थिती निर्माण होईल. मुळशी धरणाचे अतिरिक्त पाणी ओैदयोगिक क्षेत्राला दिले जाते. तसेच अंदाजे ४ टीएमसी पाणी समुद्रात जात आहे. अशा पाण्याचा वापर पिण्यासाठी आपण करू शकतो का असा विचार आल्याने मी मागणी केली आहे, असे आबा बागूल म्हणाले. हा विषय आत्ता चर्चेला आणला तर भविष्यात ४ ते ५ वर्षात मार्ग निघेल. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याची गरज लक्षात घेवून मुळशी धरणाचे ५ टीएमसी पाणी पुणे शहराला मिळणे आवश्यक आहे. तसेच टाटा कंपनीशी झालेला करार हा ब्रिटिश काळातील असून सुमारे १०० वर्षापूर्वी झालेल्या कराराचे नव्याने मूल्यमापन कोणीच केले नाही, ते करण्याची आता गरज आहे असे आबा बागूल म्हणाले. जेव्हा शहराला पाण्याची गरज भासेल तेव्हा पाणी अचानक कोठून आणणार, यासाठी याविषयी नियोजन करणे अत्यंत महत्वाचे आहे. खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पाण्याची उपलब्धता नसेल तेव्हा शहराची तहान कशी भागवणार असा प्रश्न आबा बागूलांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र शासनाने या संदर्भात अहवाल करणेस सांगितले असून सुर्वे कमिटीचा अहवाल अदयाप पूर्णत्वास आला नाही अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी दिल्यावर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले की, या संदर्भात पुणे महानगरपालिकेने जलसंधारण विभागाच्या मदतीने अपेक्षित खर्च तरतूद व कायदेशीर बाबी याबाबत अहवाल तयार करावा व पुणे महानगरपालिकेने तशी मागणी करावी. हे पाणी आपण ग्रॅव्हिटीने घेवू शकतो का? बंद पाईप लाईन मधून घेवू शकतो ? याबाबत \िजिबिलिटी रिपोर्ट तयार करावा. राज्य शासन व केंद्र शासन याबाबत अंतिम निर्णय घेतील. या संदर्भातील निर्णय राज्य व केंद्र पातळीवर होणार असला तरी महानगरपालिका पातळीवरूनही प्रस्ताव तयार करून ठेवावा. त्यामध्ये सर्व बाबींचा विचार केला जावा असे ते म्हणाले. तसेच पुण्याची सध्याची पाणीपुरवठयाची उपलब्धता लक्षात घेवून पुणेकरांना हा पाणीपुरवठा कमी पडत आहे. तसे शास्त्रशुध्द विवेचन महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाने तयार करावे अशी सूचना त्यांनी केली.
सदर बैठकीत आबा बागूल यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.खेमनार, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख श्री.पावसकर, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता श्री.धोडपकर यांचे आभार मानले.