पुणे- किती दिवस पुणेकरांना सारसबाग ,पेशवे बाग दाखविणार ..निसर्गाचे जतन करून ,कोणतीही हानी न करता तळजाईवर सुरु झालेल्या जैववैविध्य प्रकल्पातील सदु शिंदे स्टेडीयम चे तर उद्घाटन झाले पण पुढील कामाला राजकीय श्रेयवादातून विरोध सुरु झाला आणि या प्रकल्पाला ग्रहण लागले. बरे झाले आज खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी या प्रकल्पाला जणू पाठिंबाच दिला . आज त्यांनी स्थानिक प्रतीनिधी अधिकारी यांच्याशी चर्चा केली .आणि स्थायी समिती आवश्यक वाटले तर मुख्य सभेची मंजुरी घ्या आणि नंतर काही अडचण आली तर माझ्याकडे या असे हि सांगितले. असा दावा आज महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी मायमराठी शी बोलताना केला. पहा आबा बागुल काय म्हणाले ….
नेमका काय आहे हा प्रकल्प यावर बोलताना ते म्हणाले ,शहराची फुफ्फुसे असलेल्या टेकड्या आणि त्यावरील जैववैविध्य यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी माझ्या संकल्पनेतून एक सूक्ष्म आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सुमारे ५ एकर जागेवर कै. सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम साकारण्यात आले आहे. या स्टेडियमचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या उभारणीत सिमेंट आणि काँक्रीटचा वापर टाळून स्थानिक पातळीवर मिळणार्या दगड, मातीचा वापर केला आहे. त्यामुळे हे स्टेडीयम पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. त्याचबरोबर बांबू उद्यान, नक्षत्र गार्डन ,सोलर रूफ पॅनल पार्किंग या प्रकल्पांचेही भूमिपूजन झालेले असून कामे सुरु आहेत. 30वर्ष मी राजकारण आणि समाजकारणात कार्यरत आहे. अनेक पथदर्शी प्रकल्प माझ्या कारकिर्दीत शहरात साकारले आहेत. शहराच्या फुफ्फुसांपैकी महत्वाची असलेल्या तळजाई टेकडीच्या जतनासाठी, संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत.त्यानुसार सुमारे १०७ एकर क्षेत्रावर आणि महापालिकेच्या ताब्यात असलेल्या डोंगर माथा, डोंगर उताराच्या जागेवर जैववैविध्य उद्यान साकारले जात आहे. मात्र त्यासाठी कोणत्याही वृक्षाला इजा न पोहोचविता आणि पर्यावरणाला बाधा न आणता पर्यावरणपूरक प्रकल्पांची उभारणी कायद्यातील तरतुदीनुसारच होत आहे. प्रकल्पाच्या क्षेत्रात वाहनांचा वापर टाळण्यासाठी स्वतंत्र वाहनतळ असणार आहे. तेथेच सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तेथून सर्वत्र सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. ३०० किलोवॉट वीजनिर्मिती होणार असून वाहनतळात अंदाजे १४४ चारचाकी, २०१ दुचाकी , १०० सायकल आणि दोन बस पार्क होतील अशी क्षमता आहे.या सोलर रूफ पार्किंग येथे नागरिकांनी वाहने लावायची आणि तिथून व्यायामासाठी, फिरण्यासाठी जावे असे नियोजन वन्यजीव अधिवासाच्या संरक्षणासाठी आहे. नक्षत्र उद्यान, बांबू उद्यान, रानमेवा उद्यान, मसाल्याच्या वनस्पतींचे उद्यान, वनौषधी उद्यान, पुष्प उद्यान आणि सुगंधी वनस्पतींचे उद्यान असे सात संकल्पनाधारित उद्याने हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यात नक्षत्र आणि बांबू उद्यान, सोलाररुफ पार्किंग याचे काम सुरु होत आहे. या प्रकल्पांच्या विकासकामांना आणि टेकडीवरील झाडांना कै. वसंतराव बागुल उद्यान येथे सुरु केलेल्या देशातील पहिल्या ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्पातून दररोज पाच लाख लिटर पाण्याचा वापर होत आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून पिण्यायोग्य असलेल्या या पाण्यामुळे आता तळजाई टेकडी वर्षभर हिरवीगार राहणार आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याची बचतही होत आहे.