आपचे खासदार संजय सिंह यांचा पुण्यात घणाघात
आगामी पुणे मनपा निवडणुकीत आप ताकदीने उतरेल
आम आदमी पार्टी युवा आघाडीच्या वतीने महाराष्ट्र स्तरीय युवा अधिवेशन 2022 अण्णाभाऊ साठे सभागृह बिबेवाडी येथे काल दिनांक 31 जुलै रोजी पार पडले. या अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे आम आदमी पार्टीचे राज्यसभेवरील खासदार संजय सिंग यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मोदींच्या नेतृवाखालील भाजप सरकारने जल, जमीन, विमानतळ, रेल्वे, सरकारी कारखाने, विमा, तेल आणि वीज उद्योग विकले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्पोरेट उद्योगपतींची 11 लाख कोटी रुपयांची कार्पोरेटची कर्जे माफ केली आहेत. देशातील बेरोजगार युवक युवतींना अच्छे दिन आणण्यासाठी सरकारकडे कोणतीही योजना नाही, असा आरोप आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजयसिंग यांनी पुणे येथील आप युवा अधिवेशनात केला आहे. पुणे येथे आप युवा अधिवेशनाचे उदघाटन संजयसिंग यांचे हस्ते झाले.
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर टीका करताना संजय सिंह म्हणाले की त्यांचे वाक्य संविधानात्मक पदावरील व्यक्तीने असे बोलणे योग्य नाही. मुंबई व महाराष्ट्राच्या भूमीने विविध राज्यातील स्थलांतरित लोकांना रोजगार व आर्थिक उन्नतीच्या संधी दिल्याबद्दल महाराष्ट्राबद्दल कृतज्ञता हवी अशी भावना त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र ही सामाजिक धार्मिक सलोखा असलेली व्यापार उदीम, रोजगार देणारी, उद्यमशील आणि विचारवंतांची भूमी आहे. मात्र येथील राज्यपाल शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करतात. त्यांचे मानसिक स्थैर्य बिघडलेले आहे, त्यामुळे समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य ते करत असतात, असा आरोप संजय सिंह यांनी केला आहे. तसेच येत्या पुणे मनपा निवडणुकीत आप ताकदीने उतरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अग्नीवीर योजनेवर टीका करताना ते म्हणाले की, स्वतःला देशभक्त म्हणवणाऱ्या मोदी सरकारने अग्निपथ योजना आणून सैन्याचे मनोबल कमी केले आहे. सरकारच्या अर्थनीती वर ते टीका करताना म्हणाले की, या देशातील युवक, युवती, कामगार, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, उद्योजक अंगमेहनती वर्ग जी काही कमाई करून थोडेफार बँकेत ठेवत होता त्या बँका सुद्धा आता विकल्या गेल्या आहेत. या सरकारच्या काळात हिंदू मुस्लिम समाजात दुफळी निर्माण झाली आहे. विशिष्ट धर्म, वंश यांचा तिरस्कार करून जगातील कोणतीही राजवट टाकलेली नाही.
यावेळी मंचावर आप महाराष्ट्र अध्यक्ष रंगा राचूरे, राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, सचिव धनंजय शिंदे, महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंगला, निवडणूक प्रभारी महादेव नाईक, युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अजिंक्य शिंदे, युवा आघाडीचे राज्य उपाध्यक्ष संदीप सोनवणे, जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत हे उपस्थित होते.
आप राज्य अध्यक्ष रंगा राचूरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पक्ष विस्ताराच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असून कार्यकर्त्यांना येत्या मनपा निवडणुकीत झोकून देऊन काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना राज्य संघटक आणि पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी पुण्यात आम आदमी पक्ष वेगाने वाढत असून पुणे मनपा निवडणुकीत आप आपली चुणूक दाखवून देईल असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्रातील राजकारण गलिच्छ पातळीवर पोहचले असून त्या पार्श्वभूमीवर दिल्ली मॉडेल, आप याची भुरळ नागरिकांना पडत आहे, असे मत मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले युवा कार्यकर्ते नाशिकचे अभिजीत गोसावी, नागपूरच्या कृतल आकरे, कोल्हापूरचे उत्तम शिंदे यांनी युवकांच्या वतीने मनोगते व्यक्त केली.