पुणे : छत्रपती शिवाजी महाराज की जय… जय भवानी, जय शिवाजी च्या घोषणा… ढोल-ताशांचा गजर…पुणेकरांनी पालखी खांद्यावर घेत पुष्पवृष्टी करीत साजरा केलेला आनंदोत्सव… शिवरायांच्या आग्य्राहून सुटका या घटनेला ३५६ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजिलेला पालखी सोहळा…अशा शिवमय झालेल्या वातावरणात किल्ले राजगड उत्सवांतर्गत आग्य्राहून सुटका स्मृतीदिनानिमित्त आयोजित लाक्षणिक पालखी सोहळा पुण्यात थाटात साजरा झाला.
पुणे महानगरपालिका आणि श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ३५६ व्या आग्य्राहून सुटका स्मृतीदिनानिमित्त किल्ले राजगड उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्य्राहून सुखरुप किल्ले राजगड येथे परतले, त्या घटनेला ३५६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पुण्यामध्ये लाल महाल येथे लाक्षणिक पालखी प्रस्थान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, उपायुक्त माधव जगताप, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीप सिंहगील, अजित आपटे, राजेंद्र कंक, संदीप खर्डेकर, योगेश पाटील, राणी भोसले, राजेंद्र भोसले, शब्बीर सय्यद, सचिन जोशी, किशोर येनपुरे, अरुण गोसावी, अजय दुधाने, रायबा भोसले, राजेंद्र आबा शिळीमकर आदी उपस्थित होते. यंदा उत्सवाचे ४२ वे वर्ष आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, एकूण अभ्यासक्रमात केवळ दोन पानी शिवाजी महाराजांचा धडा असणे हे अन्याय करण्यासारखे आहे. आजचे हे सोन्याचे दिवस कोणामुळे आले, कसे आले हे सगळे प्रसंग तरुण पिढीला कळले पाहिजे. हे सगळे नवीन पिढीला कळण्यासाठी नवीन अभ्यासक्रमात ३० टक्के अभ्यासक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचे, सावरकरांचे, महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र यांचा समावेश असणार आहे. हे सर्व अभ्यासक्रमाच्या चौकटीत बांधायला पाहिजे ज्यामुळे महापुरुषांचा अभ्यास करणे सक्तीचे होईल.
वसंतराव प्रसादे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज सन १६६६ रोजी किल्ले राजगड येथे पोहोचले. हा दिवस मागील ४० वर्षांपासून दोन्ही संस्थांतर्फे साजरा करण्यात येतो. आग्य्राहून सुटकेचा दिवस हा शिवरायांचा पुर्नजन्म होता. त्यामुळे यंदा देखील गडावर उत्सव साजरा होणार आहे. रविवार, दि. ४ डिसेंबर रोजी किल्ले राजगड येथे वंशपरंपरेनुसार गडकरी असलेले सुर्यकांत भोसले यांच्या हस्ते सुर्योदयाच्यावेळी ध्वजारोहण होणार आहे.
यानंतर सकाळी ९ वाजता पाली दरवाजा ते महाराजांच्या सदरेपर्यंत आणि त्यानंतर पद्मावती माता मंदिर येथे पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला संभाजीराजे छत्रपती यांसह राजकीय, प्रशासकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी संपूर्ण उत्सवात शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. समीर रुपदे यांनी सूत्रसंचालन केले.