प्रकल्पाचे सोमवारी ४ वा. ऑनलाईन उदघाटन
पुणे (प्रतिनिधी) -विविध प्रकारच्या विषाणू संक्रमणाच्या काळात विषमुक्त शेतमालाची मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीचा पुरवठा मात्र होत नाही. भारतीयांना विषमुक्त शेतमालाचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने अभिनव फार्मर्स क्लब व भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) एकत्र प्रकल्प राबवणार आहे. सदर प्रकल्पाचे सोमवारी ४ वा. ऑनलाईन उदघाटन होणार आहे. अभिनवचे भूषण राऊत व बीव्हीजी ॲग्रोटेकचे प्रमुख गणेश लिमये यांनी या प्रकल्पाची नुकतीच घोषणा केली. सदर प्रकल्प राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे.
बीव्हीजी औषधांमुळे शेतमालाच्या सरासरी उत्पादनात ३० टक्क्यांनी वाढ होते. विशेषबाब म्हणजे विषमुक्त शेतमालाची (रेसिड्यू फ्री) निर्मिती होते. विषमुक्त शेतमालाची चांगल्या दराने थेटविक्री करणे सहज शक्य आहे. अभिनव फार्मर क्लब ही सेंद्रीय शेतमालाची घरपोहोच सेवा देणारी शेतकऱ्यांनी सुरु केलेली देशातली पहिली कंपनी आहे. अभिनव फार्मर्स क्लब व बीव्हीजीमुळे शेतकऱ्यांना अधिकचा नफा व नवी बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याची प्रतिक्रिया अभिनव फार्मर क्लबचे प्रमुख ज्ञानेश्वर बोडके यांनी व्यक्त केली.
रासायनिक औषधांचा वारेमाप वापर झाल्याने जमिनीची सुपीकता कमी झाली आहे. त्याचबरोबर पिकांची उत्पादन क्षमता देखील कमी झाली आहे. जमिनीची सुपीकता वाढवून विषमुक्त शेतमालाचे भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी बीव्हीजीच्या वतीने हर्बल नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून विविध खत व औषधांचे निर्माण केले जाते. बीव्हीजी औषधांच्या वापराने विषमुक्त शेतमालाचे दुप्पट उत्पादन मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होणार असल्याची प्रतिक्रिया बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केली.