पुणे शहरातील बंगले संस्कृती समाप्त पेन्शनरचे पुणे आता विसरून जायचे का?
पुणे- आज भाजपने बहुमताच्या आधारावर 6 मीटर चे सर्वच रस्ते ९ मीटर करणारी उपसूचना मंजूर करून ३२३ रस्ते रुंदीकरणाचा साधलेला डाव हा नियमबाह्य च असून या विरोधात आम्हाला आता कलम ४५१ नुसार राज्य सरकारकडे दाद मागावी लागेल असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी ‘माय मराठी’ शी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, शहरातील 6 मीटर रुंद असलेले रस्ते 9 मीटर करण्याचा घाट भाजपने घातला आहे.त्यामुळे पेन्शनरचे पुणे आता विसरून जायचं का? असा सवाल काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी आबा बागुल यांनी विचारला आहे.पुणे शहरातील नागरिकांनी भाजपला बहुमत दिले आहे.परंतु पुणेकरांच्या हिताचा विसर पडून बहुमताच्या जोरावर बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी 6 मीटर रस्त्याचे 9 मीटर रस्ते करण्याचा निर्णय चुकीचा आहे. महाराष्ट्र मूनसिपल कॉर्पोशन ऍक्ट मधील कलम 210 नुसार महानगरपालिका अस्तित्वात असलेल्या रस्त्याचे मायनर मोडीफिकेशन करू शकते परंतु शहरातील 103 किमी असलेले 323 रस्त्यांचे मोडीफिकेशन करायचे असेल तर एमआरटीपी ऍक्ट मधील कलम 37 नुसार राज्य सरकारला हे मोडीफिकेशन करण्याचे अधिकार असताना सत्ताधारी भाजप बहुमताच्या जोरावर महाराष्ट्र टाऊन प्लॅनिंग ऍक्टचे उल्लंघन करून मनमानी कारभार सुरू आहे असे आबा बागुल म्हणाले.आजच्या निर्णयामुळे भाजपने महाराष्ट्र टाऊन प्लॅनिंग ऍक्टला पूर्णपणे छेद दिला आहे.यापुढे कलम 37 ची कारवाई करणे गरजेचे नाही असे भाजपला वाटते.ज्या पुणेकरांनी त्यांना बहुमत दिले त्या पुण्याची संस्कृती,पुणेरीपण, पेन्शनरचे पुणे,बंगले संस्कृती पूर्ण नष्ट करण्याचे काम आज भाजपाने केले आहे.आजचा दिवस पुणेकरांच्या आयुष्यभर लक्षात राहील.व इतिहासात त्याची काळा दिवस म्हणून नोंद होईल असे आबा बागुल म्हणाले,पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी नियमबहाय्य असलेला हा निर्णय बदलावा अन्यथा आम्हाला पुणेकरांच्या हितासाठी या निर्णयाविरुद्ध कलम 451 नुसार राज्य सरकारकडे दाद मागावी लागेल.असे काँग्रेस पक्षाच्यावतीने आबा बागुल म्हणाले