पुणे – शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील सीसीटीव्ही कॅमेराचे जाळे अधिक मजबूत करण्यात येणार आहे. त्यासाठी काही दिवसांमध्ये संपूर्ण शहरात उच्च क्षमतेचे 1500 कॅमेरा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यास प्राधान्य दिले आहे. पुणेकरांच्या सुरक्षितेसाठी विशेष प्राधान्यक्रम दिला जाणार असल्याची ग्वाही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. आयुक्तालयात पत्रकारांनी वार्तालापात ते बोलत होते.
पुणेकरांना सुरक्षितपणे घराबाहेर पडता यावे यासाठी नवीन योजना कार्यान्वित केल्या जाणार आहेत. विविध रस्त्यांसह प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, त्यामध्ये आणखी वाढ करून सीसीटीव्हींची संख्या 1 हजार 500 पर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था भक्कम होण्यास मदत होणार आहे. यापुर्वी लावण्यात आलेल्या नादुरुस्त खॅमेऱ्यांचीही दुरुस्ती केली जाणार आहे. प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्याची क्षमता काळानुरूप बदलत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच सीसीटीव्ही अपग्रेड करण्यावर भर दिला जाणार आहे. नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासंदर्भात आठ दिवसात प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
पोलीस ठाण्यांच्या पुर्नरचनेसाठी प्राधान्य
वाढत्या लोकसंख्येमुळे पोलिस ठाण्यांच्या हद्दीची पुनर्रचना करावी लागणार आहे. त्यासाठी यापूर्वी रचना केलेल्या उपायुक्त (झोन) कार्यालयांना राज्य सरकारची मान्यता घेणे बाकी आहे. त्याचा प्रस्ताव तयार करून पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला जाणार आहे. त्यांच्या मान्यतेनंतर नव्याने सर्वेक्षण करून पोलिस ठाण्यांसह झोन तयार केले जाणार आहेत. विशेषतः हडपसर, चतुःशृंगी पोलीस ठाण्याची पुर्नरचना करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची गरज भासणार आहे.
इंटेलियन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम’ होणार वापर
वाहतूकोंडीवर उपाय म्हणून इंटेलियन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम’चा (आयटीएमएस) वापर प्रभावीपणे केला जाणार आहे. शहरात पुढील 25 ते 30 वर्षांच्या वाहतुकीचा विचार करून त्यासाठीचे नियोजन करावे लागणार आहे. वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक निर्णय घ्यावे लागणार आहे. त्यासाठी पुरेसे अधिकारी, कर्मचारी देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.