एमआयटीतर्फे पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रध्दांजली
पुणे, १८ नोव्हेंबरः“छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील १२१२ मावळ्याचा नवा इतिहास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्याने अर्ध्यावर राहिला आहे. त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत शिवचरित्रावर कार्य केले आहे. परंतू या मावळ्यांचा इतिहास आता कायमच काळाच्या पडद्या आड राहिल.” अशी भावना ज्येष्ठ मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी शिवशाहीर यांना श्रध्दांजली वाहतांना व्यक्त केली
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती आणि माईर्स एमआयटी शिक्षण समूहातर्फे कोथरुड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत श्री ज्ञानेश्वर सभागृहमध्ये ज्येष्ठ विचारवंत, थोर साहित्यिक, नाटककार, इतिहासकार व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एम.पठाण, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंन्तराव गाडगीळ, डॉ.संजय उपाध्ये आणि अश्विनी घैसास हे उपस्थित होते.
राहूल सोलापूरकर म्हणाले,“शिवछत्रपतींनी उभे केलेले २८४ किल्यांचे साम्राज्य बाबासाहेबांनी सुवर्ण अक्षरात लिहून ठेवले आहे. त्यात एक विशेष गोष्ट लक्षात येते ती म्हणजे महाराजांनी कोणत्याही किल्यावर स्वतःचे नाव लिहून ठेवलेले नाही. रायगडावर जो उल्लेख सापडतो तो म्हणजे ज्याने हा किल्ला निर्माण केला त्या संदर्भातील आहे. अशाप्रकारे इतिहासातील अत्यंत सुक्ष्म अध्ययन बाबासाहेब करीत असे. त्यांचे शिवसृष्टी निर्मितीचे स्वप्न पूर्ण करू. तसेच. जगभरातील बर्याच विद्यापीठांमध्ये शिवरायांवर अध्ययन केले जाते याचे श्रेय त्यांना जाते. सध्या देशातील नव्या पाठ्यक्रमांमध्ये शिवरायांचे १६ धडे अभ्यासक्रमात आणले आहेत.”
“बाबासाहेबांच्या जीवनात अनेक आरोप प्रत्यारोप झाले. परंतू शिवरायांची प्रेरणा घेऊन त्यांनी सहनशीलतेच्या जोरावर त्याचा सामना केला.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड,“ आपल्यातून जाणता राजा जाणे ही मनाला वेदना देणारी घटना आहे. वसुधैव कुटुम्बकम भाषा बोलणारे बरेच आहे परंतु प्रत्यक्षात साकारणारे मोजकेच आहेत. त्यातील हे एक होते. राजा शिवछत्रपती हा त्यांचा जीवनाचा श्वास आणि ध्यास होता. आयुष्यभर त्यांनी शिवछत्रपतींच्या कार्याची ओळख सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविली. शिवसृष्टी उभारण्याच्या त्यांच्या कार्यात संस्थेतर्फे योगदान देऊ. तेे थोर तपस्वी, योगी आणि ऋषी होते. त्यांच्या जीवनाचा आदर्श घेऊन तरूणांनी वाटचाल करावी. संस्थेतर्फे राजता राजा छत्रपती शिवाजी महाराज जीवन संदेश या पुस्तकांच्या १० हजार प्रती मोफत वाटणार आहोत.”
प्रा. पी.बी. जोशी म्हणाले,“महाराष्ट्रातील जनतेच्या घराघरात शिवचरित्र पोहचविणारे बाबासाहेब यांनी आपले संपूर्ण जीवन छत्रपतींसाठी अर्पण केले होते. त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी माझ्याकडून सर्वप्रकारे मदत करेल.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ शिवशाहीर बाबासाहेंबाचा वारसा पुढे कसा नेता येईल यावर विचार होणे गरजेचे आहे. त्यांनी केलेल्या प्रत्येक कार्याचे जतन करुन तरुणांना ते उपलब्ध करून दयावे. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन मी जीवनाची वाटचाल करीत आहे.”
पं. वसंतराव गाडगीळ,“दिशा आणि काळ यांच्या मर्यादा भेदून बाबासाहेबांनी अमूल्य असे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचे जतन होण्यासाठी एमआयटी संस्थेने शिवशाहीर नावाचे अध्यासन सुरू करण्याची विनंती केली.”
प्रा.डॉ.एस.एन.पठाण, अश्विनी घैसास आणि डॉ. संजय उपाध्ये यांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्याबरोबच त्यांच्याशी आलेले अनुभव सर्वांना सांगून श्रध्दांजली वाहिली.
यावेळी संस्थेचे विश्वस्त, संचालक, कुलगुरू, कुलसचिव, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी सूत्रसंचालन केले.