श्री श्री रविशंकरजी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजन ; महाराष्ट्रातील ३० हून अधिक जिल्ह्यांचा समावेश
पुणे : महा एनजीओ फेडरेशनतर्फे श्री श्री रविशंकरजी यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रातील ३० हून अधिक जिल्ह्यांमध्ये १० महत्वपूर्ण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने अक्षरओळख, वृक्ष संवर्धन, गो संवर्धन, रक्तदान, नवचेतना शिबीर , शासकीय योजनांचा प्रचार प्रसार, आरोग्य तपासणी शिबीरे , गाव तिथे वाचनालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व वारकरी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन, डिजिटल साक्षरता आदींचा समावेश आहे, अशी माहिती फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.
महा एनजीओ फेडरेशनच्या मुकुंदनगर येथील मुख्यालयात प्रकल्पांच्या पोस्टरचे अनावरण झाले. प्रकल्पांना चंद्रकांत राठी यांची अमूल्य साथ व सुरेश इंदानी, रिसो संस्थेचे वैभव मोगरेकर यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. सेवा उपक्रम उत्तमरित्या होण्यासाठी संस्थेचे संचालक मुकुंद शिंदे, कार्यकारी संचालक अक्षयमहाराज भोसले, अमोल उंबरजे, प्रणिता जगताप व गणेश बाकले आदी मेहनत घेत आहेत.
शेखर मुंदडा म्हणाले, अक्षरओळख हा उपक्रम पूर्व प्राथमिक शिक्षण घेणा-या लहानग्यांचे विशेष आकर्षण ठरत आहे. महाराष्ट्रातील शेकडो एनजीओ यात सहभागी झाल्या आहेत. जवळपास ११०० पेक्षा अधिक शाळांमध्ये अक्षरओळख आॅडियो चार्ट्स मोफत दिले जात आहेत. महा एनजीओ फेडरेशन ही महाराष्ट्रातील २००० हून अधिक सामाजिक स्वयंसेवी संस्थांची शिखर संस्था म्हणून परिचित असून आता पर्यंत हजारो संस्थांना विविध उपक्रमासाठी पाठबळ दिले आहे .
अक्षय महाराज भोसले म्हणाले, पू.गुरुदेव रविशंकरजी यांच्या संकल्पनेतून असंघटित संस्थांनी एकत्र येऊन उत्तम कार्य उभ करावे, या संकल्पनेतून महा एनजीओ फेडरेशन शेखर मुंदडा व सहकारी वर्गाने स्थापन केली. विविध उद्योग क्षेत्रातील सीएसआर छोट्या सामाजिक संस्थांना मिळवून देण्यासाठी महा एनजीओ प्रयत्नशील आहे व विशेष बाब यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आता श्री श्री रविशंकरजी यांच्या जन्मदिनानिमित्त होणारे १० कार्यक्रम देखील सामाजिक संस्था व उपेक्षितांना बळ देतील.