पुणे- जगभरात विखुरलेल्या मराठी लोकांना जोडण्यासाठी प्रवासी भारतीय दिवसाच्या धर्तीवर ‘प्रवासी मराठी दिवस’ साजरा करण्याच्या सूचनेचा पुनरुच्चार करतानाच युवा शक्तीला मराठी भाषा संवर्धनाच्या कार्यात जोडण्यासाठी ‘युवा साहित्य सम्मेलन’ सुरू करण्याची सूचना राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज येथे केली.
जानेवारी महिन्यात पिंपरी- चिंचवड येथे होत असलेल्या एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय साहित्य सम्मेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण आज राज्यपालांच्या हस्ते राज भवन येथे झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते.
‘एकम सत, विप्र: बहुधा वदंती’ या वचनाचा आधार घेत साहित्यिकांनी विचार-स्वातंत्र्य, मत-स्वातंत्र्य व श्रद्धा-स्वातंत्र्याचा आदर करणार्या आपल्या थोर परंपरेचे जतन व संवर्धन केले पाहिजे असे आग्रही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
देशात दिवाळी एकदाच साजरी होते; मात्र महाराष्ट्रात साहित्य सम्मेलन दिवाळी इतक्याच उत्साहात संपन्न होते हा मराठी भाषेचा गौरव असल्याचे विद्यासागर राव यांनी यावेळी सांगितले.
पिंपरी चिंचवडची ओळख आतापर्यंत औद्योगिक नगरी, सांस्कृतिक नगरी व पेन्शनरांचे शहर अशी ओळख होती. साहित्या सम्मेलनामुळे मात्र शहराची ओळख साहित्य नागरी म्हणून निर्माण होईल असे उद्गार अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी यावेळी काढले.
मराठी साहित्याची परंपरा मोठी असून मराठी भाषा व इतर भाषा यांमधील सेतु अधिक बळकट झाला पाहिजे अशी अपेक्षा घुमान येथे झालेल्या अठ्ठयांशीव्या साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष डॉ सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.
यावेळी पिंपरी चिंचवड साहित्य सम्मेलनासाठी समर्पक बोधचिन्ह तयार करणार्या इरावती मालेगावकर व पद्मा इराणी या कलाकार भगिनींचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सममेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ पी डी पाटील यांचे स्वागतपर भाषण झाले तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्क्यक्ष डॉ माधवी वैद्य यांनी आभार प्रदर्शन केले.