हृदयविकाराच्या 4707 रूग्णांना ‘डायल 108’ रुग्णवाहिकेने दिले जीवनदान ! पुणे शहरात 319 रूग्णांना मिळाला लाभ
पुणे :
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्या ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’च्या ‘डायल 108’ रूग्णवाहिका सेवेद्वारे 4707 हृदयविकाराचा झटका आलेल्या रूग्णांना अत्याधुनिक रूग्णवाहिकेतील उपचारामुळे आणि वेळीच रूग्णालयात दाखल केल्यामुळे जीवनदान मिळाले ! ही आकडेवारी 26 जानेवारी 2014 ते 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या तपशीलानुसार आहे.
‘108’ हा दूरध्वनी डायल केल्यानंतर ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’च्या सुसज्ज रुग्णवाहिका मदतीला येतात. या रूग्णवाहिकेमध्ये 233 ‘अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट’ रूग्णवाहिका असून, 704 ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ रूग्णवाहिका आहेत.
या आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या संचालनाची जबाबदारी ‘बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड’ या सेवाक्षेत्रातील अग्रगण्य कंपनीकडे असून, पुण्यातील ‘औंध उरो रुग्णालयात’ या सेवेचे प्रमुख केंद्र व ‘रिस्पॉन्स सेंटर’ आहे.
अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज ‘डायल 108’ रूग्णवाहिकेच्या आप्तकालीन वैद्यकीय सेवेमुळे हृदयविकारासारख्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांवर तातडीने उपचार होणे सोपे झाले आहे. 26 जानेवारी 2014 ते 31 डिसेंबर 2015पर्यंतच्या तपशीलानुसार पुणे शहरात 34 हजार 923 जणांना तर संपूर्ण राज्यभरात 5 लाख 93 हजार 356 जणांना या आपत्कालीन रूग्णवाहिका सेवेचा लाभ मिळाला आहे.
‘26 जानेवारी 2014 रोजी सुरू झालेल्या या सेवेत अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा 937 रुग्णवाहिका राज्यभर आहेत. यामध्ये 233 ‘अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट’ रूग्णवाहिका असून, 704 ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ रूग्णवाहिका समाविष्ट आहेत. या अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी ‘108’ या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास विनामूल्य सेवा देणारी सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. अपघात, हृदयविकार, भोवळ येणे, अर्धांगवायू, विषबाधा, आगीत भाजणे अशा अनेक प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये ही रुग्णवाहिका बोलावता येते’, अशी माहिती ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.
31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या तपशीलानुसार राज्यातील कार्डियाक रूग्णांना दिलेल्या आपत्कालीन ‘108’ सेवेची जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे, अहमदनगर (212), अकोला (42), अमरावती (111), औरंगाबाद (237), बीड (54), भंडारा (21), बुलढाणा (105), चंद्रपूर (76), धुळे (80), गडचिरोली (36), गोंदीया (33), हिंगोली (97), जळगांव (189), जालना (64), कोल्हापूर (175), लातूर (81), मुंबई (714), नागपूर (277), नांदेड (292), नंदूरबार (38), नाशिक (196), उस्मानाबाद (85), पालघर (38).परभणी (49), पुणे (319), रायगड (83), रत्नागिरी (79), सांगली (66), सातारा (100), सिंधुदूर्ग (75), सोलापूर (160), ठाणे (229), वर्धा (104), वाशिम (66), यवतमाळ (126).