पुणे—राजकीय विडंबनातून केलेल्या कोट्या त्यातून उडालेल्या हास्यफवाऱ्यांबरोबरच अंतर्मुख करायला
लावणारे राजकारणातील वास्तव, पाणी, जमिनीच्या प्रश्नावरून काव्याद्वारे मांडलेली वेदना, तंत्रयुगात संपत
चाललेले मानवी संबंध यांवर केलेल्या रचना, श्रोत्यांकडून प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात मिळालेला उत्स्फूर्त
प्रतिसाद आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी प्रसंगानुरूप कोट्या करीत केलेले सूत्रसंचालन यामुळे पुणे
फेस्टिव्हल अंतर्गत मराठी कविसंमेलन गाजले.
विद्रोही कवी संभाजी भगत यांच्या
बया पहाटेच्या ग बारी
कुणी नव्याने गाणी गातो…
नव्याने गाणे गातो अन,
धक्का चावडीला देतो ग माझे माई… या खेड्यातील आणि शहरातील काम करणाऱ्या
महिलांवरील रचनेला आणि
सालो साल पेरलं आणि मातीतच जिरल
पाटीवर पेरलं तर त्याची फुलं होतात
पुस्तकं पैशांची झाडे होतात.
ही प्राचार्य सुरेश शिंदे यांनी शिक्षणामध्ये झालेले बदल व संगणीकरण यावर आधारित दोन पिढ्यांची कविता
डॉ. महेश कोळूस्कर यांच्या राजकीय, सामाजिक स्थितीवर विडंबन करणाऱ्या
अकलेचे कांदे इथे तिथे स्वस्त
कांदा भाजी मस्त पुढे चालू ..
मौनी बाबा म्हणे भाईयो बहिणो
फापडा आपडो पुढे चालू…
या रचनेला श्रोत्यांनी शिट्या व टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
नितीन देशमुख यांच्या
ओकतो अंगार मी भोगतो शृंगार मी
विस्तवा छेडू नको पावसाचा यार मी..
या गझलरूपी रचनेला आणि भारत दौंडकर यांच्या
गुंठा गुंठा जमीन विकून आज गोफ आला गळ्यात
पण, एक प्लेट मातीचा वास हुंगण्यासाठी रक्त येईल डोळ्यात
या अंतर्मुख करायला लावलेल्या ‘गोफ’ या रचनेने प्रेक्षकांनी दाद दिली.
कौस्तुभ आठल्ये या युवा कवीने सादर केलेल्या
जरी अजिबात कोणाची फिकीर स्वप्नात नसते
तरी तसे वागण्याची परवानगी जगण्यात नसते
प्रत्येकजण बघतात वसंताचीच स्वप्ने
किती झडतात पाने त्या अगोदर ज्ञात नसते.
या प्रेमात पडलेल्या प्रियकराच्या भावना व्यक्त करणाऱ्या रचनेला उपस्थित युवक श्रोत्यांनी दाद देत नाट्यगृह
डोक्यावर घेतले.
किशोर मोगल यांनी ज्ञानाचा त्रास कसा व कुणाला होतो यावर प्रकाश टाकणारी
तीन तीन लेकरं पण एक नाही कामचं
म्हातारपण चालले हाय नाव घेत रामाचं ..
अस्मिता जोगदंड यांच्या
सरळ सरळ जगता याव म्हणून
किती वाकड्या वाटेने जातो आपण
खरं बोलता यावं म्हणून किती पचवतो आपण
तर अरुण पवार यांच्या
पांढरं सोन पिकवलं ते मातीमोल विकू
आणि विकतं ते पिकवलं तर म्हणता तुम्ही अफू
मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू..
या मुक्त अर्थव्यवस्था आल्यानंतर बदललेल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर प्रकाश टाकणाऱ्या रचना सादर करून
प्रेक्षकांना अंतर्मुख केले.
अरुण म्हात्रे यांच्या
विसरता येत नाही असे नसतेच काही
मनाला सांधणारे नवे मिळतेच काही
या रचनेला व तुकाराम धांडे यांच्या भूगोल या जमिनीचे महत्व सांगणाऱ्या कवितेलाही प्रेक्षकांनी दाद दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या हस्ते जेष्ठ कवी संभाजी भगत यांचा
विशेष सत्कार करण्यात आला. पुणे फेस्टिवलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, काका धर्मावत, संतोष उणेचा,
श्रीकांत कांबळे यांच्या हस्ते अन्य कवींचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे फेस्टिवलच्या सांस्कृतिक
कार्यक्रमाचे समन्वयक मोहन टिल्लू हे उपस्थित होते.
कलर्स मराठी वाहिनी पुणे फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक आहेत.