पुणे-संत तुकाराम गाथा अनुदानासाठी मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, वित्तमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या घरासमोर जाऊन कीर्तन करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे राज्यप्रमुख लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितले.
गाथारूपाने शब्दधन जनलोका देऊन मराठी वाड्मय समृद्ध करणार्या जगद्गुरू संत तुकाराम गाथेला शासकीय अनुदान मिळणे बंद झाले आहे. २00८ पूर्वी या गाथेच्या प्रतीसाठी ६८ रुपये खर्च येत होता. त्या वेळी शासकीय अनुदान असल्याने ही गाथा जनतेला अवघ्या ५0 रुपयांना मिळत होती. मात्र, मार्च २0१४ पासून एका प्रतीसाठी तब्बल १00 रुपये खर्च येत आहे. शिवाय, शासकीय अनुदानही संपले. असे असताना केवळ १00 रुपयांना संत तुकाराम गाथा विकली जात आहे. निर्मितीमूल्यांपैकी दहा रुपयांचा भार देवस्थान उचलत आहे. त्यामुळे राज्य शासनाने अनुदान पूर्ववत सुरू केल्यास वारकर्यांना संत तुकाराम गाथा पुन्हा ५0 रुपयांना मिळू शकेल, अशी माहिती खाबिया यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील अनुदान संपल्यानंतर २00९ साली तत्कालीन कॉँग्रेस-राष्ट्रवादी, कॉँग्रेस सरकारने १५ लाखांचे अनुदान दिले होते. त्यानंतर तब्बल ७0 हजार गाथांची निर्मिती करण्यात आली. तुकाराम गाथा जनसामन्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाचे अनुदान मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाने अनुदानाबाबतचा निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खाबिया यांनी दिला आहे.