पुणे-उद्धव ठाकरे ठरवतील तो फडणवीस सरकारचा अखेरचा दिवस असेल असे स्पष्ट प्रतिपादन करीत राज्यातले सरकार तरी शिवसेनेनच्याच कृपेवर चालले असल्याचा गर्भित इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिला
अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप-शिवसेनेत सुरू असलेल्या कुरबुरींबाबत थेट भाष्य करताना, सांगितले कि ‘राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडे पूर्ण बहुमत नसून, शिवसेनेने अनेक मुद्द्यांबाबत विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी वेगळा निर्णय घेतला, तर फडणवीस सरकारचा तो अखेरचा दिवस असेल,’ असे नमूद करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सरकारच्या अस्थितरतेवर बोट ठेवले. भाजप-शिवसेनेतील दरी वाढत चालली असल्याने मुदतपूर्व निवडणुकीसाठी तयार राहण्याचा संदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला असतानाच, अजित पवार यांनीही त्याचीच री ओढत फडणवीस सरकारच्या भवितव्याची दोरी शिवसेनेच्या हाती असल्याची टिपण्णी केली.
पवार म्हणाले, राज्यातील नव्या सरकारमधील मतभेद मात्र अवघ्या सात महिन्यांतच चव्हाट्यावर आले असून, शिवसेनेच्या मुखपत्रातूनच सरकारच्या अनेक निर्णयांवर जाहीर टीका केली जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला, तर भाजपच्या अल्पमतातील सरकारचे दिवस भरले.’
‘नुसताच लाल दिवा मिळाला; पण अधिकार मिळाले नाहीत, निर्णयप्रक्रियेत सामावून घेतले जात नाही, अशी तक्रार सत्तेत सहभागी असलेल्या भाजपच्या मित्रपक्षाकडूनच केली जात आहे. भारत-पाक संबंधांविषयी देखील शिवसेनेकडून वेगळा विचार व्यक्त केला जात असल्याने हे सरकार किती काळ तग धरेल, याबद्दल शंका आहे,’ असेही पवार म्हणाले.