शासनाने अपुऱ्या पाणीसाठ्यांमुळे धरणांतील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. परंतु, पिण्याव्यतिरिक्त धरणांतून पाणी सोडण्याचे अधिकार मला नाहीत. त्यामुळे गणेश विसर्जनासाठी नदीत पाणी सोडायचे झाल्यास त्यासाठी विभागीय आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितलेत्याचबरोबर .गणेश विसर्जनासाठी अनंत चतुदर्शीला (रविवारी) खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्याची आवश्यकता आहे का, या संदर्भातील स्पष्ट अहवाल जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुणे महापालिकेला मागितला आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. गणेशोत्सवामध्ये पाचव्या, सातव्या आणि विसर्जनादिवशी धरणांतून पाणी सोडण्यात येते. यंदा पाणीसाठ्याची स्थिती बिकट आहे. गणपती विसर्जनासाठी साधारणतः 168 दशलक्ष घनफूट पाणी नदीत सोडावे लागणार आहे. हे पाणी शहराला दोन दिवस पुरेल एवढे आहे, असे पत्रात म्हटले आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. गणेश विसर्जनासाठी शहरात किती ठिकाणी विसर्जन हौदांची व्यवस्था केली आहे. अजून कितीची गरज आहे, याचे मूल्यमापन करावे, तसेच खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये खरोखर पाणी सोडण्याची आवश्यकता आहे का, यासंबंधीचा अहवाल देण्यात यावा, असे पत्रात म्हटले आहे. अहवाल एक दिवसात द्यावा, अशीही सूचना केली आहे.