पुणे : राशीन ( नगर ) येथे युक्रांद कार्यकर्त्यांवर हल्याचा, घर जाळण्याच्या प्रयत्नाचा निषेध ३० ऑगस्ट रोजी गांधीभवन येथे बैठकीत करण्यात आला .कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्या राशीन दौऱ्याच्या वेळी शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवेदन देण्याची तयारी करणाऱ्या युक्रांद चे कार्यवाह अप्पा अनारसे आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते आणि आणि राशीन(नगर) युक्रांदचे अध्यक्ष श्री किरण पोटफोडे यांचे घर जाळण्याचा प्रयत्न राशीन सरपंच महिलेच्या पतीने केला व त्यांना जबरी मारहाण केली. २८ ऑगस्ट रोजी रात्री हा प्रकार घडला.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीना अटक केली आहे .
मारहाणीचा,घर जाळण्याच्या प्रयत्नाचा महाराष्ट्र युवक क्रांती दल तर्फे निषेध पुण्यात ३० ऑगस्ट गांधीभवन येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला.डॉ कुमार सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली .बैठकीला अन्वर राजन , कार्यवाह संदीप बर्वे ,शहराध्यक्ष सचिन पांडुळे ,संघटक जांबुवंत मनोहर ,डॉ प्रवीण सप्तर्षी ,डॉ उर्मिला सप्तर्षी,ऋतुजा पुकाळे ,समीर मराठे ,महेश पाटील ,सुदर्शन चखाले ,जय दहिफळकर इत्यादी उपस्थित होते.
पोलीस यंत्रणेने अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या सांगण्यावरून मंत्र्यांची सभा होईपर्यंत एक दिवस युवक क्रांती दलाच्या राज्य पदाधिकारी व स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले ,मूलभूत अधिकारांवर भाजपचे अतिक्रमण होत आहे असा आरोपही या बैठकीत करण्यात आला .
या बैठकीनंतर माध्यमांसाठी निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले .
‘गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रामध्ये अठरा हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. यापैकी पाच हजारांहून जास्त आत्महत्या या विद्यमान महाराष्ट्र शासनाच्या फसव्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर झालेल्या आहेत. शासनाच्या तत्वतः, अंशतः, सरसकट या शब्दछलामध्ये गुंतून शेतकरी जरजर झाला आहे. शासनाच्या नाकर्तेपणाबद्दल युवक क्रांती दल कृषी राज्यमंत्री असलेल्या सदाभाऊ खोत यांना सरकारचे प्रतिनिधी म्हणून निवेदन देणार होते. तसेच निवेदन न स्वीकारल्यास काळे झेंडे दाखवणार होते.
त्या निवेदनामध्ये तातडीने संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळावा या स्वरूपाच्या मागण्या होत्या. हे सर्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाला धरूनच होते. पण डॉ. बाबासाहेबांचे नाव घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या आणि हिंदुत्ववाद्यांच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्या काही समाजकंटकांना ही गोष्ट खटकत होती.
त्या समाजकंटकांनी युवक क्रांती दलाच्या पदाधिकाऱ्याला जबरी मारहाण करून त्याचे घर पेटवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या समयसुचकतेमुळे आणि योग्य कारवाईमुळे त्यातल्या काही समाजकंटकांना घटनास्थळीच अटक करण्यात आली. या सर्व प्रकारामध्ये युवक क्रांती दलाचा उद्देश हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा मार्ग अनुसरून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणे हाच होता.
राशीन ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेमुळे लोकांना जर शुद्ध पाणी प्यायला मिळाले तर याचा अतोनात आनंद युवक क्रांती दलाला आहे. राशीनच्या सभेत अहिंसक निदर्शने होणार नव्हती. तरीही राशीनच्या सरपंच महिलेच्या पतीने राशीन युक्रांदचे अध्यक्ष श्री किरण पोटफोडे यांचे घर जाळण्याचा प्रयत्न केला व त्यांना जबरी मारहाण केली. या मारहाणीचा महाराष्ट्र युवक क्रांती दल निषेध करते.
पोलीस यंत्रणेने अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व स्थानिक आमदार ना. राम शिंदे यांच्या सांगण्यावरून मंत्र्यांची सभा होईपर्यंत एक दिवस युवक क्रांती दलाच्या राज्य पदाधिकारी व स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले होते.
संपूर्ण देशभर नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर भाजप सरकार आक्रमण करीत आहे. संविधानाने अहिंसक निदर्शने करण्याचा अधिकार समस्त नागरिकांना दिलेला आहे. संविधानाच्या पायमल्लीचा महाराष्ट्र युवक क्रांती दल तीव्र निषेध करत आहे.
आमच्या आंदोलनाला अनेक सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनी व सामान्य नागरिकांनी प्रत्येक्ष भेटीद्वारे, फोनद्वारे व समाजमाध्यमांवर आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला, त्या सर्व हितचिंतकांचे युवक क्रांती दल आभार व्यक्त करते.