‘भारतीय जैन संघटनेच्या ६०० विद्यार्थ्यांना राजभवनामध्ये निमंत्रण’
पुणे: “भारतीय जैन संघटना आत्महत्याग्रस्त शेतकार्यांची मुले तसेच आदिवासीच्या मुलांसाठी खूप मोठ कार्य करते आहे. ज्यावेळी मला या संघटनेकडून मुलांच्या भेटीसाठी निमंत्रण आले, त्यावेळी मी एक क्षणही न घालवता भेटीस होकार कळविला. आज मला या सर्व मुलांना भेटून अतिशय आनंद होत आहे. मी या सर्व विद्यार्थ्यांसोबत पूर्ण वेळ घालवू इच्छितो त्यासाठी मी त्यांना राजभवनाच्या भेटीसाठी व सहभोजनासाठी निमंत्रण देऊ इच्छितो. राजभवनाचे दार या विद्यार्थ्यांसाठी सदैव उघडे असतील.” अशी भावना महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भारतीय जैन संघटनेच्या कार्यक्रमवेळी केली.
भारतीय जैन संघटनेने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ३०० मुलांना तसेच ३१२ आदिवासी मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव हे या सर्व मुलांच्या खास भेटीला आहे होते. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी या विद्यार्थ्यांविषयी मनोगत मांडले.
तसेच, “सरकारी शाळांची स्थिती आता बरी जरी असली तरीही काही शाळांमध्ये शिक्षक नसल्यामुळे तेथील परिस्थिती गंभीर आहे आणि आपले सरकार यावर सकारात्मक कार्य करीत आहेत. परंतु, भारतीय जैन संघटना सरकारची मदत न घेता स्वतःच्या कर्तुत्वावरवर उभी आहे ही कौतुकास्पद बाब आहे मला सतत त्यांचे कौतुक वाटते” असेही ते म्हणाले. तसेच, “नर्सिंग क्षेत्रामध्ये केरळमधील मुले सातत्याने पुढे जात आहेत. या क्षेत्रात करिअर करणारे अनेक विद्यार्थी परदेशात स्थायिक झाले आहेत. महाराष्ट्रातील मुलेदेखील या क्षेत्रात पुढे जावोत असे वाटते, त्यासाठी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घ्यावा.” असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
“आम्ही मुलांची फक्त शैक्षणिक प्रगती करीत नाही तर त्यांना भारताचा समंजस नागरिक घडविण्याचा प्रयत्न करीत असतो.” असे मत भारतीय जैन संघटनेचे संस्थापक संचालक शांतीलाल मुथा यांनी या कार्यक्रमाच्यावेळी व्यक्त केले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले तसेच आदिवासी मुलांचे पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षणाचा भार भारतीय जैन संघटनेने उचलला आहे. परंतु बारावी नंतरच्या शिक्षणाची जबाबदारीही आम्ही निभावू, त्यासाठी आम्ही अनेक संस्थेशी बोलत आहोत, अशी भावना शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमवेळी वाघोलीच्या सरपंच संजीवनी वाघमारे ह्या उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक बीचे आणि आभार प्रदर्शन शांतीलालजी बोरा यांनी केले.