पुणे – एकीकडे डीझेल चे दर कमी होत असताना पीएमपी ची दरवाढ करण्यात येत असल्याने -आणि महापालिकांचा कारभार राष्ट्रवादींच्या पदाधिकार्यांच्या हाती असल्याने
पीएमपी तिकीट दरवाढीने राष्ट्रवादी अधिक बदनाम होत आहे मात्र याकडे लक्ष द्यायला कोणीही उत्सुक नसल्याचे दिसत आहे यामुळेच पुण्यातील दुचाकी वाहने मोठ्या संख्येने रस्त्यावर येत आहेत हि वस्तुस्थिती आहे
खिळखिळ्या पीएमपीचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी पुणेकर प्रवाशांवरच सहा ते पंचवीस रुपयांच्या तिकीट दरवाढीचा बोजा पडणार आहे. पीएमपीने सादर केलेल्या दरवाढीच्या प्रस्तावाला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) गुरुवारी मान्यता दिली असून, उद्यापासून (शनिवार) ही दरवाढ लागू होणार आहे. दैनंदिन व मासिक पासच्या दरात वाढ करण्यास मात्र प्राधिकरणाने नकार दिला आहे.
पहिल्या सहा किलोमीटरच्या प्रवासाचे दर कायम ठेवण्यात आले असून, सहा किलोमीटरनंतरच्या प्रवासाच्या तिकीटदरात सहा ते पंचवीस रुपयांनी वाढ होणार असल्याचे प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सौरव राव आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘ग्रामीण भागातील मार्गांवरील तिकीटदरांमध्ये तुलनेने अधिक वाढ करण्यात आली आहे. त्या भागात एसटीच्या दरांमध्ये समानता आणण्याच्या उद्देशाने हे धोरण स्वीकारण्यात आले आहे. मात्र, दैनिक पास, मासिक पास, विद्यार्थी-ज्येष्ठ नागरिकांचे सवलतीचे पास व ‘पुणे दर्शन’च्या पासमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.’
तिकीट दरवाढ अपरिहार्य असल्याचे दोन दिवसांच्या चर्चेअंती लक्षात आल्यानंतर त्याला मान्यता दिल्याचे राव यांनी सांगितले. या दरवाढीतून पीएमपीला दरमहा १०८ कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. यापूर्वी जानेवारी २०१३ मध्ये पीएमपीच्या तिकीटदरात वाढ करण्यात आली होती, तर ऑगस्ट २०१३ मध्ये या दरांचे सुसूत्रीकरण (रॅशनलायझेशन) करण्यात आले होते. जानेवारीनंतर डिझेल आणि सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या पीएमपीला दरमहा सुमारे १६ कोटी रुपयांची तूट येत असून, त्याचा
परिणाम बससेवेवर होत आहे, असे पीएमपीने म्हटले आहे.