पुणे :
ग्रामीण भागातून आलेल्या आणि खानावळीवर अवलंबून असलेल्या पुण्यातील विद्यार्थ्यांना रविवारी १५ रुपयात पोटभर जेवण देण्याचा अभिनव उपक्रम शिवसंग्राम विद्यार्थी आघाडी तर्फे या रविवार पासून (दि ११ ऑक्टोबर २०१५ ) पासून सुरु होत आहे .
शिवसंग्राम विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शैलेश सरकटे ,संपर्क प्रमुख तुषार काकडे यांनी हि माहिती दिली . पुण्याच्या नवी पेठ भागातील (शास्त्री रस्ता ) धर्मवीर संभाजी विद्यालय (मनपा शाळा क्रमांक १७ ) येथे हा उपक्रम प्रायोगिक स्वरुपात सुरु होणार आहे
शिवसंग्राम चे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे .
या वेळेस ८०० जणांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे . पोळी भाजी ,वरण भात ,गोड पदार्थ यांचा या ‘पोटभर जेवणात ‘ समावेश आहे .
खानावळी रविवार सायंकाळी बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैर सोय होते . आणि महाग जेवणाकडे वळावे लागते .
बरोबर एक महिन्यापूर्वी घटक पक्षांच्या विद्यार्थी हक्क परिषदेत शैलेश सरकटे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा रास्त दरातील भोजनाचा प्रश्न मांडला होता . राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर यांनी या प्रश्नांचे आणि गरजेचे रुपांतर उपक्रमात करावे यासाठी शैलेश सरकटे यांना प्रोत्साहन दिले . शैलेश सरकटे ,दीपक बिडकर ,अमित शिंदे यांच्या अनेक बैठ्कातून नियोजन करत ११ ऑक्टोबर पासून हा उप्रकम पुण्यात प्रत्यक्षात येत आहे .
आताही खानावळीवर अवलंबून असणाऱ्या शैलेश सरकटे ,अमित शिंदे यांनी आणि विद्यालयीन काळात असाच अनुभव घेतलेल्या दीपक बिडकर यांनी चर्चेतून या उपक्रमाला आकार दिला . शिवसंग्राम चे अध्यक्ष विनायक मेटे यांनीही विद्यार्थ्यानच्या धडपडीचे कौतुक केले . रासप अध्यक्ष आमदार महादेव जानकर यानाही निमंत्रित करण्यात आले आहे
‘राजकीय संघटना केवळ प्रश्न मांडून थांबत नाहीत ,तर उत्तरेही शोधतात ,हे सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुण्यातील होस्टेल वर पत्रके वाटून माहिती देण्यात आली आहे . यावेळी विद्यार्थ्यांनी प्रकल्पाचा अभ्यास करून,वर्गणी काढून हा प्रायोगिक उपक्रम सुरु केला आहे . पुढील रविवार पासून तो स्थायी स्वरुपात यावा ,साठी समाजातील देणगीदारांनी पुढे यावे ‘ असे आवाहन शैलेश सरकटे यांनी केले.