पुणे- कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य यांचा मनोहारी मिलाप असणाऱ्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे जेष्ठ
अभिनेते व खासदार राज बब्बर यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले. महोत्सवाचे यंदाचे २१ वे वर्ष आहे.
‘मै नही जानता अच्छे दिन कब आनेवाले है, मगर हसने वाले दिन मैने पुना मे कई बार देखे है’, असे
म्हणत त्यांनी आपल्या राजकीय व्यक्तिमत्वाचे दर्शन घडविले.
श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झालेल्या या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी माजी आमदार उल्हास पवार,
महापौर दत्तात्रय धनकवडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.विश्वजित कदम, आमदार शरद रणपिसे,
माजी आमदार मोहन जोशी माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, बाळासाहेब शिवरकर, म्हाडाचे(पुणे) माजी अध्यक्ष अंकुश काकडे,
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल उद्योगपती सुभाष सणस, वीरेंद्र किराड, नरेंद्र
व्यवहारे, विठ्ठल लडकत तसेच सिनेतारका शर्वरी जमेनीस, अश्विनी एकबोटे, गिरीजा जोशी, तेज देवकर
आणि तेजस्विनी लोणारी आदी मान्यवर उपस्थित होते.
राज बब्बर यांच्या हस्ते यावेळी शिक्षणतज्ज्ञ कर्नल बालसुब्रमण्यम, ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी, ज्येष्ठ
कथक नृत्यांगना-गुरू शमा भाटे, लावणी नृत्यांगना आरती नगरकर आणि अभिनेते शिवराज वाळवेकर
यांना श्री लक्ष्मीमाता कला संस्कृती पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले. प्रत्येकी ११
हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
जेष्ठ सनई वादक महादेव तुपे यांच्या सनई वादनाने उद्घाटन सोहळ्यास आरंभ झाला. त्यानंतर सर्व
मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन आणि देवीच्या आरतीने २१ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे उद्घाटन
झाले. उद्घाटन कार्यक्रमानंतर अंजली मनोहर आणि अनिरुद्ध नारवेलकर यांची सतार आणि तबला
जुगलबंदी, नृत्यगुरु शमा भाते याच्या नादरूप संस्थेच्या कलाकारांनी सादर केलेल्या नेत्रदीपक गणेश वंदना-
इशास्तुती या विशेष नृत्याविष्काराने, त्यापाठोपाठ विनोद धाकटे व सहकारी यांनी सदर केलेला येळकोट
येळकोट जय मल्हार हा लग्नसोहळा व देवीचा गोंधळ, कोंदण ग्रुपने सदर केलेला मंगळागौरिचा बहारदार
खेळ आणि रत्नाकर शेळके डान्स अॅकेडमीच्या युवा कलावंतांनी सदर केलेल्या फ्युजनने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध
केले. पायाल वृंदच्या निकिता मोघे यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेतारका सर्वारी जमेनीस, अश्विनी एकबोटे,
गिरीजा जोशी, तेजा देवकर, आणि अश्विनी लोणारी यांच्या दिलखेचक बहारदार लावणी नृत्याने उद्घाटन
सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरेल. प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांनी दाद देत रंगमंच दणाणून सोडले. या
उद्घाटन सोहळ्यानंतर श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रंग जल्लोष हा मराठी गीतांचा कार्यक्रम
सारेगामा फेम सुजित सोमण, सायली कुलकर्णी व इतर कलाकारांनी सादर केला.
मै नही जानता अच्छे दिन कब अने वाले है…
राज बब्बर यांनी व्यासपीठावर मागच्या बाजूला लावलेल्या कै. सुधीर फडके, सरस्वतीबाई राणे. ग. दि.
माडगुळकर, जोत्स्ना भोळे यांच्या नावाचा उल्लेख करत साहित्य, संस्कृती, कला जपणाऱ्या या महान
व्यक्तींना देशाला काय अपेक्षित आहे हे चांगले माहिती होते असे गौरोद्गार काढले. आपल्या शैलीमध्ये ‘मै
नही जानता अच्छे दिन कब आणेवाले है, मगर हसने वाले दिन मैने पुना मे कई बार देखे है’ असा टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांनी लगावला. तुलसीदास नंतर गीतरामायणाने आपल्या मनात
घर केले व ते कै. सुधीर फडके यांनी ते आपल्या पर्यंत पोहचविले असे त्यांनी सांगितले. पुण्याचे
उपामहापौर आबा बागुल यांनी सुरु केलेल्या महोत्सवाच्या मंचावर नगर पालिकेच्या शाळांमधील
विद्यार्थ्यांपासून ते अनेक जेष्ठ व प्रख्यात कलावंतांनी आपली कला सादर केली ही खरोखर अभिनंदनीय
बाब असल्याचे नमूद करून त्यांनी आबा बागुल यांचे कौतुक केले.
उल्हास दादा पवार म्हाणाले, आबा बागुल यांच्या रूपाने झपाटून काम करणारा, आपल्या प्रभागाचा आणि
शहराच्या विकासाचा ध्यास असलेला आणि मनपा कायद्याचा अभ्यास असणारा नगरसेवक पुणे शहराला
मिळाला आहे. पुणे नवरात्रौ महोत्सवाचा मी सुरुवातीपासूनचा साक्षीदार आहे. शिक्षणतज्ज्ञ कर्नल
बालसुब्रमण्यम, ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी, ज्येष्ठ कथक नृत्यांगना-गुरू शमा भाटे, लावणी नृत्यांगना
आरती नगरकर आणि अभिनेते शिवराज वाळवेकर यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा उल्लेख
करत त्यांनी त्यांचा गौरव केला. तसेच राज बब्बर यांच्या चित्रपट सृष्टीतील कामापेक्षाही त्यांच्या
संसदेतील, त्यांच्या मतदार संघातील कामाचा लेखाजोखा मांडत त्यांचे कौतुक केले.
बालसुब्रमण्यम म्हणाले, आपल्या देशाची संस्कृती काय आहे हे पुणे नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून
बघायला मिळते. अशा प्रकारचे महोत्सव नेहेमी झाले तर देशात नक्की शांतता नांदेल.
शमा भाटे म्हणाल्या, पुणे नवरात्रौ महोत्सवाचा दरवर्षी वाढत जाणाऱ्या दिमाखदारपनाची मी गेली १८ वर्षे
साक्षीदार आहे. शास्त्रीय संगीत व नृत्य भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते आणि आबा बागुल यांनी
पुणे नवरात्र महोत्सवात त्याला मनाचे स्थान दिले आहे.
माहापौर दत्तात्रय धनकवडे, मोहन जोशी, डॉ. विश्वजित कदम यांनी आबा बागुल यांनी त्यांच्या प्रभागात
तसेच त्यांच्या कल्पनेतून शहरात झालेल्या विकास कामांची प्रशंसा केली. तसेच पुणे नवरात्र महोत्सव हा
केवळ पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रातला ख्याती मिळवलेला महोत्सव असल्याचे नमूद केले.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात आबा बागुल यांनी राज बब्बर यांच्याबद्दल असलेल्या त्यांच्या मनातील
भावना व्यक्त केल्या. माझ्या वाढदिवसापेक्षाही जास्त आजच्या दिवसाची मी वाट पाहत होतो अशा
भावना व्यक्त करून बागुल यांनी राज बब्बर यांच्या चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीला उजाळा दिला. तसेच
बब्बर यांच्या संसदेतील व राज्यसभेतील कामकाजाचा गौरव केला.
अभिनेते शिवराज वाळवेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
आभार घनश्याम सावंत यांनी मानले.