अनाथ मुले सरकारी अनास्थेचे बळी
http://www.loksatta.com/desh-videsh-news/orphens-victim-of-govt-apathy-1049849/
अल्पसंख्य, अराजकीय व असंघटित असल्याने अनाथ मुले संवेदनाहीन प्रशासनाचे बळी ठरत असल्याची खंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केली. पुण्यात आरोग्य विभागात काम करणाऱ्या एका अनाथ कर्मचारी महिलेस जात प्रमाणपत्राशिवाय पदोन्नती देणार नाही, अशी आडमुठेपणाची भूमिका वरिष्ठांनी घेतली आहे. यासंबंधीचे वृत्त ‘दै. लोकसत्ता’त सोमवारी प्रसिद्ध झाले होते.
त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. लवटे म्हणाले की, राज्य सरकारमध्ये किमान पंधराशे अनाथ कर्मचारी आहेत. प्रत्येकाला केवळ जात प्रमाणपत्र नसल्याने डावलण्यात येते. अनाथांविषयी सरकारला आस्था नाही. जे अनाथ दत्तक जाऊ इच्छितात त्यांच्याविषयी सरकारकडे धोरण नाही. अनाथ, त्यात लालफितीच्या कारभाराचे बळी, असे दुहेरी संकट त्यांच्यावर असते. विविध कामांसाठी जातीच्या दाखला सादर करण्यातून सूट मिळावी यासाठी सद्यस्थितीत राज्य सरकारकडे २०० प्रस्ताव प्रलंबित आहेत. युवतींची समस्या यापेक्षाही भीषण आहे. त्यांना लग्न करताना अनंत अडचणी येतात. अनाथाश्रम चालवणाऱ्या संस्था सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करतात. परंतु त्यांनाही दाद दिली जात नाही. दोन वर्षांपूर्वी सरकारने आदेश काढून २०१२ नंतर अनाथाश्रम सोडलेल्यांना जातीचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक नसल्याचा दाखला देण्याची जबाबदारी संस्थांकडे सोपवली आहे.
अनाथाश्रमातून बाहेर पडल्यावर संबंधित व्यक्तीशी कायमस्वरूपी संपर्क ठेवून त्याच्या ख्यालीखुशालीची नोंद करणे सरकारी यंत्रणेला बंधनकारक आहे.
मात्र अनाथाश्रमातून बाहेर पडून तीस वर्षे झाल्यानंतरही अनेकांना संबंधित संस्थेकडून संपर्क केला जात नाही. अनेक अनाथ आज स्वत:च्या पायावर उभे आहेत. अनेक जण तसा प्रयत्न करीत आहेत, परंतु संवेदनाहीन सरकारकडून त्यांना कोणतीही मदत केली जात नाही, असे डॉ. लवटे म्हणाले.
Regards,
Vijay Kumbhar
(Surajya Sangharsh Samiti)
www.surajya.org
vijaykumbhar.blogspot.in
09923299199