‘एम अॅंड एम’चे वाहन बाळगण्याने खिशावर येणारा ताण, हा आपण विचार करता त्यापेक्षाही कमी आहे.
सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या गैरसमजांचे निराकरण आम्ही येथे केले आहे; जेणेकरून तुम्ही गाडीची निवड जाणतेपणे करावी.
वाहन खरेदी करण्याचा निर्णय अनेकदा अवघड असतो. आपले पुढील वाहन निवडताना अनेक निकषांचा विचार करणे आवश्यक असते. कार बाळगण्याच्या खर्चाला खूप महत्त्व द्यावे लागते. यात केवळ कारच्या खरेदीची किंमतच नाही, तर कारवर तिच्या एकूण आयुष्यभरात कराव्या लागणाऱ्या सर्व प्रकारच्या खर्चांचाही समावेश असतो.
गाडीच्या आपल्या मालकीची असतानाच्या कालावधीत, तिच्यावर होणाऱ्या खर्चाची अचूक गणना करणे कठीण असले, तरी तिच्या देखभालीशी संबंधित काही शंका आणि काही गैरसमज यांविषयी आम्ही काही स्पष्टीकरण देऊ शकतो.
‘महिंद्रा अॅंड महिंद्रा’चे वाहन बाळगताना, त्यावर होणाऱ्या खर्चाशी संबंधित काही सामान्य गैरसमज पुढीलप्रमाणे –
गैरसमज क्र. 1 : माझ्या गाडीची सर्व्हिसिंग मी दर 3-4 महिन्यांनी करायला हवी.
‘महिंद्रा अॅंड महिंद्रा’च्या वाहनांना हे लागू होत नाही. इतर कंपन्यांच्या वाहनांमध्ये काही ठराविक कालावधीनंतर ऑईल व इतर फ्ल्युईड्स बदलण्याची शिफारस केली जाते, मात्र ‘महिंद्रा अॅंड महिंद्रा’च्या वाहनांमध्ये असा कोणताही ठराविक कालावधी दिला जात नाही. गाडी नियमित चालविली जात असेल, तरच तिचे सुटे भाग झिजतात, म्हणून आम्ही गाडी किती किलोमीटर चालली आहे, त्यावर तिच्या सर्व्हिसिंगचे नियोजन करतो. या पद्धतीने सर्व्हिसिंगची आखणी केल्याने, उगीचच ऑईल व फ्ल्युईड बदलून पर्यावरणाचे नुकसान होणे आम्हाला टाळता येते. अर्थात, कालांतराने ऑईल व फ्ल्युईड खराब होत असते, त्यामुळे ते 1, 2 किंवा 3 वर्षांनी बदलण्याची शिफारस आम्ही ग्राहकांना करतोच. कोणत्या प्रकारची ही फ्ल्युईड्स आहेत, त्यावर त्यांचा बदलण्याचा अवधी ठरतो. वेगवेगळी फ्ल्युईड्स बदलण्याचा कालावधी किती आहे, हे जाणण्यासाठी आपल्या गाडीचे माहितीपत्रक वाचा.
गैरसमज क्र. 2 : प्रत्येक ‘सर्व्हिसिंग’मध्ये इंजिन ऑईल बदलले पाहिजे.
इंजिन ऑईल बदलण्याबाबत ऑईलच्या उत्पादकांनी काही निकष ठरवून दिलेले असतात. गाडी किती किलोमीटर चालली किंवा पूर्वी ऑईल बदलून किती काळ लोटला, यावर आताचे ऑईल बदलणे अवलंबून असते. या दोन्हीपैकी जी गोष्ट अगोदर उद्भवेल, त्यावेळी हे ऑईल बदलून घ्यावे लागते. ही वेळ साधारण प्रत्येक ‘सर्व्हिसिंग’मध्ये किंवा एकाआड एक ‘सर्व्हिसिंग’मध्ये येऊ शकते. आपली गाडी ठराविक किलोमीटर अंतर धावली नसेल, तरीदेखील ऑईल उत्पादकाने घालून दिलेल्या कमाल कालमर्यादेत इंजिन ऑईल बदलून घ्यावे, अशी आम्ही शिफारस करतो. काही विशिष्ट काळानंतर ऑईल खराब होते, ते बदलण्याने इंजिन सुरळीत व सुलभतेने चालते.
गैरसमज क्र. 3 : गाडीच्या खिडक्यांच्या काचा खाली घेतल्याने, इंधनाची बचत होते.
हा एक मजेशीर प्रश्न आहे, जो खूप वेळा विचारला जातो. चला, हा प्रश्न एकदाचा तडीस नेऊ.
आपल्या वाहनाच्या मायलेजवर परिणाम करणारे अनेक घटक असतात – वायुगतिकता (एअरोडायनामिक्स) हा त्यापैकी एक आहे.
जेव्हा आपण खिडक्यांच्या काचा खाली घेऊन गाडी चालवतो, तेव्हा गाडीच्या बाजूने वाहणारे वारे खिडक्यांमधून आत येऊन, ते गाडीच्या गतीला आतून अवरोध करते. त्यामुळे गाडीचे मायलेज कमी होते. विशेषतः गाडीचा वेग जास्त असताना हे अधिक लक्षात येते.
खिडक्यांचा काचा वर घेतल्याने, गाडीच्या बाजूने वाहणारे वारे गाडीच्या काचांच्या गुळगुळीत पृष्ठभागावरून निघून जाते आणि आपल्या वाहनाची वायुगतिकीय कार्यक्षमता सुधारते; परिणामी अधिक मायलेज मिळते.
गैरसमज क्र. 4 : इंजिन सुरू केल्यावर आणि ते थांबविण्यापूर्वी काही मिनिटे, मी इंजिन जागेवर चालू ठेवले पाहिजे.
हे काही अनिवार्य नाही. टर्बोचार्ज्ड इंजिनांच्या बाबतीत, ‘टर्बोचार्जर’ला इंजिनमधून वंगणाचे तेल प्राप्त होते. इंजिन सुरू झाल्यानंतर हे तेल ‘टर्बोचार्जर’पर्यंत पोहोचण्यास काही सेकंद लागतात. आपले वाहन गेल्या वेळी केव्हा वापरले होते, यावर हे अवलंबून असते. इंजिन चालू केल्यावर त्याची गती वाढविण्यापूर्वी काही सेकंद प्रतीक्षा करणे केव्हाही चांगलेच असते. त्याचप्रमाणे इंजिन बंद करण्यापूर्वी, काही सेकंद प्रतीक्षा करणेही हितावह ठरते, कारण त्या काही सेकंदांमध्ये ‘टर्बोचार्जर’चा प्रचंड वेग कमी होण्यास मदत होते. अर्थात हे असे करणे अनिवार्य नाही.
गैरसमज क्र. 5 : सतत पंक्चर टाळण्यासाठी, टायरमध्ये नेमून दिल्यापेक्षा जास्त हवा भरली पाहिजे.
हा एक नेहमीचा गैरसमज आहे आणि सामान्य परिस्थितीत त्याचे पालन कधीही केले जाऊ नये. गाडी जास्तीत जास्त सुरक्षित राहण्यासाठी, टायरमधील हवेचा दाब हा कंपनीने ठरवून दिल्याप्रमाणेच ठेवला पाहिजे. टायरमध्ये हवेचा दाब जास्त असेल, तर गाडी योग्य पद्धतीने हाताळता येत नाही आणि गाडीच्या सुरक्षिततेस बाधा येऊ शकते. टायरमधील जास्त दाबामुळे, टायरचा रस्त्याशी असलेला संपर्क कमी होतो आणि टायर लवकर झिजतात. असे झिजलेले व हवेने फुगलेले टायर बदलून घेण्याची वारंवार वेळ येते.