पुणे : भारतातील अग्रगण्य आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘पीएनबी मेटलाइफ’ने पुण्यातील दिवे या गावात वृक्षारोपण मोहीम आखून आपला २१वा वर्धापन दिन साजरा केला. या वृक्षारोपणाच्या माध्यमातून कंपनीने शाश्वत पर्यावरणासाठी आपले योगदान दिले आहे.
‘पीएनबी मेटलाइफ’चे अधिकारी, कर्मचारी, वितरक आणि भागीदार यांनी या पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाच्या भागात रोपे लावण्यासाठी स्वेच्छेने काम केले, तसेच झाडे जोपासण्याच्या आणि जमिनीची मशागत करण्याच्या कामात स्थानिक समुदायाला मदत केली.
‘पीएनबी मेटलाइफ’चे सीएचआरओ शिशिर अग्रवाल म्हणाले, “एकवीस वर्षांच्या आमच्या प्रगतीच्या प्रवासात आम्ही ग्राहकांना सर्वोत्तम उत्पादने व सेवा यांचा आनंद दिला आणि सदैव त्यांच्या सेवेसाठी समर्पित राहिलो. पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या परिणामांना रोखण्यासाठी सक्रिय पावले उचलण्यात आम्ही ‘पीएनबी मेटलाइफ’मध्ये विश्वास ठेवतो. आमचे लोक, ग्राहक आणि एकंदर समाज यांचे भवितव्य अधिक आत्मविश्वासपूर्ण घडवण्याच्या आमच्या कंपनीच्या उद्देशाशी आमचे हे प्रयत्न सुसंगत आहेत. या वृक्षारोपण मोहिमेद्वारे वर्धापनदिन साजरा करून, आम्ही अधिक शाश्वत जग निर्माण करण्यासाठी योगदान देण्याचे ध्येय ठेवतो.”
ही वृक्षारोपण मोहीम ‘ग्लो ग्रीन’ अंतर्गत आयोजित करण्यात आली होती. ‘ग्लो ग्रीन’ हा ‘पीएनबी मेटलाइफचा’च एक उपक्रम आहे आणि समाजात शाश्वत बदल घडवण्यासाठीच्या कंपनीच्या कटिबद्धतेचा तो अविभाज्य भाग आहे. या उपक्रमांतर्गत, उत्तराखंड, दिल्ली एनसीआर, कर्नाटक आणि पुणे या चार ठिकाणी ४० हजार झाडे लावण्याचे आणि त्यांचे संगोपन करण्याचे पीएनबी मेटलाइफचे उद्दिष्ट आहे. ही रोपे भारतात सुमारे ५०हून अधिक एकर जमिनीवर हिरवाई निर्माण करतील, तसेच आपल्या संपूर्ण जीवनकाळात सुमारे ३५,००० टनांहून अधिक प्रमाणात ऑक्सिजन तयार करण्यास आणि सुमारे २०,००० टनांहून अधिक प्रमाणात कार्बन डायऑक्साइडचे दुष्परिणाम कमी करण्यास मदत करतील.
या भागांत वृक्षारोपण केल्याने आसपासच्या समुदायांना आणि गावांनाही त्याचा फायदा होईल, हवेची गुणवत्ता सुधारेल, तसेच पक्षी, कीटक आणि वन्यजीवांच्या रूपात जैवविविधता वाढेल आणि भूजलाचे पुनर्भरण होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रोपे लावण्यासाठी आणि त्यांचे निरीक्षण करण्यासाठी स्थानिक समुदायातील लोकांना नियुक्त करण्यात आल्याने ग्रामीण रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदतही होईल.