मुंबई: पिरामल उद्योगसमुहाने ‘कोविड-19’ विरुद्धच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार, ‘पंतप्रधान नागरीक मदत व आपत्कालीन सहाय्य निधी’ला (पीएम-केअर्स फंड) 25 कोटी रुपये दिले आहेत.
जगभरातील कोट्यवधी लोकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या साथीच्या आजारावर मात करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांमागे पिरामल समूह एकजुटीने उभा आहे. करोना व्हायरसच्या या संकटामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व आव्हानाचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने यापूर्वीच तैनात करण्यात आलेल्या मनुष्यबळ आणि सेवांना आर्थिक पाठबळ देण्याचा हा पिरामल समुहाचा प्रयत्न आहे.
पिरामल समुहाची पिरामल फाउंडेशन ही समाजसेवी संस्था असून ती संपूर्ण भारतभरातील 25 राज्यांमध्ये कार्यरत आहे. प्राथमिक आरोग्य सेवा आणि पोषण सेवा (पिरामल स्वास्थ्य), शिक्षण नेतृत्व आणि महिला व युवा सबलीकरण (पिरामल स्कूल ऑफ लीडरशिप), तसेच पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सुविधा (पिरामल सर्वजल), असे प्रकल्प राज्य आणि केंद्र सरकार यांच्या भागीदारीत चालविले जातात. यातून, समाजातील उपेक्षित घटकांना सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेलच्या माध्यमातून चांगले जीवनमान देण्याचा समुहाचा उद्देश आहे.
पिरामल समुहाने सरकारच्या भागीदारीत देशाच्या दुर्गम भागात कोविड-19 विषाणूवर मात करण्यासाठी तीन पद्धतींनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य कर्मचार्यांच्या सहकार्याने, ‘पिरामल स्वास्थ्य’ या संस्थेने 7 राज्यांमध्ये आरोग्य हेल्पलाइनची स्थापना केली आहे. डॉक्टर, रुग्णालये आणि वैद्यकीय माहिती यांच्यापासून वंचित राहिलेल्या समाजातील विविध घटकांना या हेल्पलाइनच्या माध्यमातून आरोग्यविषयक सल्ला, मदत व उपाय पुरविण्यात येत आहेत. दररोज 50 हजार जणांचे कॉल्स या हेल्पलाइनला येत असतात, त्यापैकी 20 टक्के कॉल ‘कोविड-19’शी संबंधित असतात. राजस्थानच्या झुंझुनू येथील ‘पिरामल स्कूल ऑफ लीडरशिप’ने आपल्या 40 हजार चौरस फुटांच्या प्रशिक्षण सोयीसह इतर पिरामल अनुदानित शाळांचा उपयोग विलगीकरण केंद्र म्हणून करण्याचा प्रस्ताव जिल्हा अधिकाऱ्यांना दिला आहे. पिरामल सर्वजल या संस्थेतर्फे दररोज 7 लाख जणांना शुद्ध पेयजल पुरविले जाते. यासाठी 627 हून अधिक पाण्याची एटीएम केंद्रे वापरली जातात. या सुविधांचा उपयोग आता ‘कॉन्टॅक्टलेस स्मार्टकार्ड’ तंत्रज्ञानासह होत आहे. त्यामुळे करोना व्हायरसचा संसर्ग कमी होण्यास मदत होणार आहे.
पिरामल समुहाचे अध्यक्ष अजय पिरामल हे स्वतः, तसेच भारतीय उद्योग क्षेत्रातील इतर नामवंत व्यक्ती महाराष्ट्र राज्य सरकारला ‘कोविड-19’चे संकट हाताळण्याच्या प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहकार्य करीत आहेत. विद्यमान रूग्णालयांचा सर्वतोपरी सक्षमपणे उपयोग करून घेणे, रुग्णांच्या विलगीकरणासाठी नवीन वेगळे बेड्स उपलब्ध करणे, रुग्णालयांमध्ये अतिआवश्यक अशी औषधे, सुविधा, उपकरणे व व्हेंटिलेटर्स यांची उपलब्धता सुनिश्चित करणे, अन्न-धान्य व इंधन यांचा पुरवठा करून देणे अशी मदत हे सर्व उद्योजक करीत आहेत. राज्यांची आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा करोना व्हायरसच्या संकटाला पिटाळून लावण्यासाठी पुरेशी सक्षम असावी, हा यामागे या उद्योजकांचा हेतू आहे.
पिरामल समुहातील औषधनिर्माण कंपन्यांमध्ये जीवरक्षक औषधे व आरोग्यविषयक उपकरणे, सेवा यांचे उत्पादन करण्यात येते. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रासाठी ही उत्पादने महत्वपूर्ण मानली जातात. सध्याच्या या महामारीच्या संकटात पिरामल समुहाचे जगभरात असलेले अतिआवश्यक औषधांचे 14 कारखाने संपूर्णपणे कार्यरत आहेत.