पुणे: महाबँकेच्या द्रष्ट्या संस्थापकांनी लावलेल्या बीजाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून बँकिंग सेवेच्या सर्व अद्ययावत सुविधा सन्माननीय ग्राहकांना आपुलकीच्या सेवेसह करत असल्याने अडीच कोटीपेक्षा अधिक ग्राहकांचा विश्वास या बँकेने संपादन केला आहे आणि हीच या बँकेची खरी शक्ति असल्याचे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए. एस. राजीव यांनी केले. बँक ऑफ महाराष्ट्रचा 84 वा व्यवसाय वर्धापन दिन पुणे येथील मुख्य कार्यालयासह बँकेच्या सर्व अंचल कार्यालयात साजरा करण्यात आला. हा दिवस ‘कर्मचार्यांचा प्रतिबद्धता दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी राजीव बोलत होते.
श्री ए. सी. राउत, कार्यकारी संचालक बँक ऑफ महाराष्ट्र यांनी कालानुरूप घडणारे बदल स्वीकारताना बँकेने कर्तव्यास ‘सेवा’ म्हणून स्वीकारल्याने कठीण काळातही बँक स्वत:चे अस्तित्व टिकवू शकली आणि या सेवाभावामुळेच बँकेच्या प्रगतीसह ग्राहकांचे हित जपू शकली असे म्हणाले.
बँकेचे कार्यकारी संचालक श्री हेमन्त टम्टा म्हणाले की, खडतर काळात अधिक परिश्रमांची आवश्यकता असून पुढील प्रत्येक दिवस कठोर स्पर्धेचा आहे आणि या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येकाने सजग राहून जिव्हाळ्याची सेवा ग्राहकांना देण्यानेच बँक अधिक सक्षम होईल. सर्व कर्मचारी ग्राहकांना अपेक्षित अशी आपुलकीची सेवा भविष्यातही देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बँकेच्या पुणे मुख्यालयी आयोजित कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला. यावेळी आयोजित विविध गुणदर्शन कार्यक्रमात कर्मचार्यांनी गायन, एकपात्री, नकला कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मनोरंजन केले. यावेळी पुणे शहर आणि पुणे पश्चिम अंचल कार्यालयातील कर्मचार्यांसह सर्व उच्च पदस्थ अधिकारी आणि कर्मचार्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.