ॠषी कपूर आज आपल्यात नाही.वयाच्या 67 व्या वर्षी अनंताच्या प्रवासाला निघून गेला.यावर आजिबात विश्वास बसत नाही.हरहुन्नरी सदाबहार , दिलखुलास आणि मिश्किल असा ॠषी कपूर आज एकदम खामोश झालायं.. आणि त्याला हे असं पाहून जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिए वाला काहीसं फिल होतयं. बैचेन होतयं. तस सिने स्टार मंडळीशी आपला काय संबंध असतो?दोन घटका मनोरंजन हा त्यांचाही आणि आपलाही हेतू असतो.पण या दोन घटकांमध्येच काही जण मनावर खोलवर ठसले जातात.आणि कायमचे आपले होऊन जातात.भले रोज आपण त्यांना पाहत नसू परंतु समोर त्याचा एखाद्या सीन चालू आहे आणि आपण न पाहता निघून जातोयं असं होत नाही.ऋषी कपूर त्यातलाच एक होता.
दि ग्रेट राज कपूर यांचे मोठे अपत्य म्हणजे चिंटू उर्फ ॠषी .जन्मापासूनच भाग्याची साथ लाभल्यानेच सर्वार्थांने बलाढ्य अशा कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. शिवाय राजबिंडे रुप ही होतंच दिमतीला. सिने क्षेत्रात यायला त्यावेळी एवढं पुरेसे होतं
सिने क्षेत्रातली त्याची सुरुवात ,”मेरा नाम जोकर “मध्ये बालकलाकार म्हणून झाली. त्याबद्दल त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.,”मेरा नाम जोकर” चे सपशेल अपयश पुसायला घरकी मुर्गी दाल बराबर या उक्तीनुसार राज कपूर ने आपल्य” चिंटू ला उभा केला.आणि ,”बाॕबी” ने इतिहास घडवत ॠषी कपूर ला जबरदस्त यशाची चव /सुपर डुपर हिट चाखायला दिली.वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी ॠषी कपूर उत्कृष्ट नट म्हणून नावारुपाला आला. आणि अर्थातच त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.
देखणं रुपा बरोबरच,संगिताचा कान,लयीत मुरलेला त्याचा पदन्यास आणि अभिनयाचा पिढीजात वारस्याला ॠषी प्रामाणिकपणे पुढे नेत राहिला. फस्ट डान्सर, गिटारिष्ट या किताबा बरोबरच साधारण तीस नवोदित नायिकांनी ॠषी कपूर सोबत सिनेमात पहिल्यांदा पदार्पण केल्याचा विक्रम ही ॠषी कपूर नावावर नोंद आहे.
बाॕबी नंतर जहरिला इन्सान, राजा,, खेल खेल में, रफू चक्कर, जिंदादिल, लैला मजनू, कभी कभी, अमार अकबर अँथनी, हम किसी से कम नही, दुसरा आदमी, बदलते रिश्ते, आ’पके दिवाने, प्रेम रोग ,जमानेको दिखाना है, एक चादर मैलिसी ,सागर नगिना, नसीब , घर घर कहानी,विजय,घराना,चाँदनी ,अजूबा
हिना, दिवाना, बोल राधा बोल, दामिनी , साहिबा, गुरुदेव , याराना , दरार, प्रेम ग्रंथ , ये हे जलवा , फना , दिल्ली 6 लव्ह आज कल , दो दुणे चार , पटियाँला हाऊस , अग्निपथ , हाऊसफूल, स्टुडंट आॕफ दी ईयर, औरंगजेब, डी डे , चष्मे बहाद्दूर, शुध्द देसी रोमान्स, बेशरम , कपूर अँड सन्स , 102 नाॕट आऊट , मुल्क आणि 2019 मधला द बाॕडी हा त्याचा अखेरचा चित्रपट.
हे त्याने केलेल्या सिनेमापैंकी काही निवडक सिनेमे. यातही सुरुवातीच्या काळातल्या सिनेमांमध्ये एक गोष्ट समान होती ती म्हणजे प्रेमवीराची भूमिका.चाॕकलेट बाॕय हे बिरुद ही म्हणूनच त्याला,मिळाले. होय ॠषी कपूर ने बहुतांशी सिनेमांमध्ये चाॕकलेट बाॕय या वन लायनर खालीच भूमिका साकारल्या आहेत. आणि म्हणूनच आख्या सिनेक्षेत्रांमध्ये त्याच्या ताकदीचा रोमँटिक होरो कोणी साकारुच शकले नाही. ती त्याचीच खासियत होती. स्वतः ॠषी ने या टिपिकल भूमिका करताना जाणीवपूर्वक बदल केला असला तरी बाज तोच राहिला. आणि तीच त्याची इमेज बनली. मुख्य म्हणजे प्रेक्षकांना ही त्याच्या अशाच भूमिका आवडत असत.
या इमेज मधून बाहेर पडण्यासाठी म्हणून त्याने काही वेगवेगळे सिनेमे ही केलेत. अगदी एक चादर मैलीसी,दामिनी,मुल्क,आणि अग्निपथ. पण त्याला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. उदा. दामिनी मध्ये दामिनी अर्थातच मिनाक्षी शेषाद्री आणि मोठ मोठ्यांने बोलणारा सनी देवल भाव खाऊन गेले. प्रेक्षकांनी मला नजरअंदाज केलं. अशी खंत ॠषी कपूर ने वेळोवेळी बोलून दाखावली आहे.
सिनेमा समजून उमजून करताना त्याने स्वतः मध्ये केलेले जाणीवपूर्वक बदल दिसून येतात. इथे एक चादर मैलीसी चा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. पण या कडे समीक्षकच पाहू शकले. जनता जनार्दन ला हे असले काही पचनी पडत नाही. परिणामी प्रगल्भता सिध्द करुनही अपेक्षित असलेले वैविध्यपूर्ण रोल ॠषी कपूर च्या वाट्याला त्याकाळी आलेच नाहीत. या शिवाय त्याच्या देखण्या रुपाला विशेषतः चेहर्याला मर्यादा होत्या. आणि हे स्वतः त्याने मान्य ही केलं. याच राजबिंड्या रुपाने त्याला ठराविक भूमिकांमध्येच ठेवले. तो कधीच गरीब,भिकारी हा वाटू शकला नसता.
याशिवाय 80 चे दशक हा अमिताभ चा एरा होता. एकापाठोपाठ एक सलग हिट देणार्या अँग्री यंग मॕन चा ॲक्शन चा जमाना होता.
अधूनमधून विनोद खन्ना ही असायचा..पण सगळेच करतात म्हणून किंवा जमानाच स्टंट चा आहे म्हणून ॠषी ने बळेच मारधोडपट सिनेमे केले नाहीत. अगदी जरुरीपुरते हाणामार्या केल्या.स्वतःला जे जमेल,पचेल आणि मुख्य म्हणजे शोभेल तेच त्याने केले. या ही काळात त्याने हिट सिनेमे दिले. काळाची गरज ओळखत मल्टिस्टारर सिनेमे ही केलेत. पण त्याला कुणी कामाच्या बाबतीत मागे टाकलेयं अस कधीच झालं नाही. कारण त्याच्या वाट्याला येणार काम तो चोख करीत होता.
ॠषी कपूर च्या यशामध्ये त्यावर चित्रित केलेल्या गाण्यांचाही मोठा वाटा आहे. समकालीन गीतकार,संगीतकार आणि गायकांनाही त्याला रोमँटिंक हिरो म्हणून सादर करताना उच्चतम असेच दिलयं.आणि या सर्वाच्या मेहनतीला ॠषी कपूर ने आपल्या बहारदार सादरीकरणाने न्याय दिलायं.
नाहीम्हणायला इथे टिकून राहण्याकरीता जे जे जमेल ते ते त्याने स्वतःला सांभाळत केले.
पण गळ्यापर्यतची स्पर्धा आणि नवनवीन येणारे चेहरे त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. तरीही सिनेमा सोडून
ॠषी कपूर ने दुसरे काही ही केल्याचे आठवत नाही. स्वतःच्या मर्यादा व्यवस्थित ओळखून असल्याने सिनेमा या पहिल्या वाहिल्या खानदानी प्रेमावरच तो ठाम राहिला. ही मोठी गोष्ट आहे. सिनेमाच्या प्रेमापोटीच ॠषी कपूर ने स्वतःमध्ये काळानुरुप बदल केले. आणि दुसर्या इनिंग मधूये त्याला वैविध्यपूर्ण भूमिका मिळू लागल्या आणि तो संधीचे सोने करत राहिला. प्रेम रोग मधला त्याचा अगदी बेसिक प्रश्न तो थेट तिलाच विचारतो – सारे इन्सान जब एक जैसे है तो कोई एक ही क्यू दिल को भाता हे मनोरमा? बोलो ना ? अग्निपथ मधला ,”रौफ लाला” हे प्रेक्षकांसकट स्वतः ॠषी कपूर ला ही सरप्राईज होते. हा रौफ लाला बघताना अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. मुल्क मधला ॲड.मुरादअली महंमद आठवा. अतिशय संयमी आणि सुलझलेला भारतीय पाकिस्तानी ॠषी कपूर ने पूर्ण ताकदीनिशी उभा केलायं. हे एखादा मुरलेला कसलेला अभिनेताच करुं जाणे.सिनेमाचे सगळे संदर्भ बदलत जात असले तरी त्याची सिनेमावरची निष्ठा कधीच बदलली नाही. जवळजवळ चार दशकांहून अधिक कारकीर्दीच्या या रंगतदार प्रवासाबद्दल त्याने कायमच समाधान आणि आनंद व्यक्त केलायं. त्याच्याशी संबंधित लोकांबद्यादल त्तूयाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. यातून त्यांचे तृप्त व्यक्तीमत्व दिसून येते. सिनेमा व्यतिरिक्त त्याचा समाजातील अत्यंत सभ्य ,शालीन वावर त्याच्या फँन्स ना सुखावणारे असायचा.
काही वर्षापूर्वी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल मध्ये विशेष वार्तालापांत बोलताना त्यांना जवळून अनुभवता आले.तेव्हा सिनेमा विषयीची त्यांची तळमळ स्पष्ट कळत होती.
गेल्या दोन वर्षापासून त्याला ल्युकेमियाँने पछाडलेले असले ,तरी उपचारादरम्यान ही आता काम मिळेल का?या विचारात तो असायचा. गंभीर राहणे हा त्याचा स्वभाव नव्हताच मुळी. स्वभावातील मिश्किल पणामुळेच तो शेवटच्या श्वासापर्यंत तरोताजा राहिला.
त्याच्या समाधानीवृत्तीमुळे ॠषी कपूर
“खुल्लमखुल्ला ” या त्याच्या आत्मचरित्रात अस म्हणतो की अत्यंत प्रसिध्द बापाचा मुलगा आणि एका प्रसिध्द मुलाचा बाप म्हणून या घडीला समाधानी आहे
जीवन के दिन छोटे सही हम भी बडे दिलवाले..कल की हमे फुरसत कहाँ सोचे तो हम मतवालें..यात्याच्यावर चित्रित झालेल्या पंक्तीप्रमाणेच जगलेल्या
ॠषी कपूर ला माझा अलविदा.
© विद्या घटवाई