बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची पहिली मराठी निर्मिती असलेल्या ‘बाबा’ चित्रपटाविषयी सध्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत बरीच उत्सुकता आहे. ‘संजय दत्त प्रॉडक्शन्स’ व ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’निर्मित आणि राज आर गुप्ता दिग्दर्शित ‘बाबा’ चित्रपट २ ऑगस्ट २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आगळ्या अशा कथेवर बेतलेला, पण क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी पटकथा आणि तिला तेवढ्याच सशक्त अभिनयाची जोड रसिकांसमोर येत असल्याने या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तसेच ‘भावनेला भाषा नसते’,हा सरळसाधा संदेश ‘बाबा’ चित्रपटातून देण्यात आला आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणात चित्रित झालेला हा चित्रपट पाहणे चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे.
‘बाबा’मध्ये ‘तनु वेडस मनू’ आणि ‘हिंदी मिडीयम’ फेम दीपक दोब्रीयाल याची प्रमुख भुमिका आहे. तो या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याच्याबरोबर नंदिता पाटकर प्रमुख भूमिकेत आहे. त्यांना स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि प्रमुख भूमिकेतील बालकलाकार आर्यन मेंघजी यांची साथ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले आहे. याआधी त्यांनी ‘धागा’ या झी5 वर प्रदर्शित झालेल्या मराठी लघुपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाला रोहन रोहन यांचे संगीत असून पार्श्वसंगीत सुस्मित लिमये यांचे आहे.
चित्रपटाची सहनिर्मिती ‘संजय एस दत्त प्रॉडक्शन्स’बरोबर ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’च्या अशोक आणि आरती सुभेदार यांच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझर आणि पोस्टरला सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद लाभतो आहे.‘अडगुलं मडगुलं‘ या गेल्या आठवड्यात प्रकाशित झालेल्या पहिल्या गाण्यालाही रसिकांनी डोक्यावर घेतले आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी आणि इतर भाषेतील चित्रपटसृष्टींमध्येही चित्रपटाचा बोलबाला आहे. या चित्रपटाचा पहिला ट्रेलर दस्तुरखुद्द संजय दत्तने चित्रपटातील सर्व अभिनेते आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत नुकताच प्रकाशित केला. या ट्रेलरने चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक वाढवली आहे कारण चित्रपटात अनेक चकित करणारे टप्पे असल्याचा अंदाज बाबाचा हा ट्रेलर देतो.
एका ऐकू-बोलू न शकणाऱ्या जोडप्याची आणि त्यांच्या आठ वर्षांच्या बोलू न शकणाऱ्या मुलाची ही कथा आहे. एका छोट्याशा गावात आपल्या छोट्याशा विश्वात हे कुटुंब खुश आहे. पण अशातच एक वादळ त्यांच्या आयुष्यात येते. एक उच्चभ्रू जोडपे त्यांच्या घरी येते आणि त्यांच्या मुलावर आपला हक्क सांगते. स्थानिक पोलीस हस्तक्षेप करतात आणि त्यांना मुलावरील हक्क कोर्टात शाबित करून आणायला सांगतात. त्यातून पुढे काय होते,बाबा सर्व संकटांवर मात करून आपल्या मुलाला त्या कायदेशीर लढाईत जिंकतो कि त्याला हार मानावी लागते, हे अनुभवण्यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट रसिकांना पाहावी लागणार आहे.
‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’चे अशोक सुभेदार म्हणतात की “ह्या चित्रपटाच्या मनिष सिंगने लिहिलेल्या मूळ कथेला राज गुप्ता यांचे उत्तम दिग्दर्शन लाभले आहे. बाप आणि मुलाची ही एक सुंदर अशी कथा आहे. कोकणातल्या निसर्गरम्य चित्रीकरणामुळे ते अधिकच खुलले आहे. याची कथा प्रत्येक वयोगटातील प्रत्येक रसिकाला खिळवून ठेवेल आणि त्याला भावूक करेल, यात शंका नाही.”
दिग्दर्शक राज आर गुप्ता यांनी म्हटले, “माझे असे ठाम मत आहे कि भावनांना भाषा नसते. हा संदेश या चित्रपटातील कलाकारांनी अगदी सुंदररित्या अधोरेखित केला आहे. एक कुटुंब सर्व आव्हानांवर मात करत एकत्र राहण्यासाठी कशी धडपड करत असते, याची ही एक आंबट-गोड कथा आहे.”