-अभिनेते देव गील यांच्या उपस्थितीत ‘बटरफ्लाय‘ हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात.
पुण्याची तन्वी ‘बटरफ्लाय’मधून प्रेक्षकांच्या भेटीला
पुणे : छोट्या-छोट्या गोष्टीवरून नवरा-बायको विभक्त होण्याचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणत वाढताना दिसत आहे. मात्र, नवरा-बायको विभक्त झाल्यानंतर मुलांवर याचा मानसिक आघात होतो. मुलांची फरफट होते. याच सामाजिक प्रश्नावर भाष्य करणाऱ्या ‘बटरफ्लाय‘ या हिंदी चित्रपटातून पुण्याची तन्वी झळकणार आहे. पद्मा फिल्म्स प्रोडक्शन आणि कुमारी टॉकीज प्रस्तुत ‘बटरफ्लाय‘ या हिंदी चित्रपटाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या परिसरात तरुणाईच्या जलोषपूर्ण वातावरणात प्रसिद्ध अभिनेते देव गील यांच्या हस्ते चित्रीकरणाला सुरुवात झाली.
यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक रवी थंबिजी, मुख्य कलाकाराच्या भूमिकेतील अभिनेते देव गील, तन्वी, प्रिंस, बालकलाकार गोविंदा कोनकर, यश देशमुख, अभिनेते सुरेश विश्वकर्मा, माजी महापौर अंकुश काकडे, प्राचार्य दिलीप शेठ, जवाहर चोरगे, राजेंद्र वाळुंज, नितीन खत्री, व्यंकटेश भोंडवे, गौरव नाईक, अभिजित बोरा, नगरसेविका सुजाता शेट्टी, नगरसेवक धनंजय जाधव, माजी नगरसेवक सदानंद शेट्टी, अभिनेत्री झोया झवेरी, संजना मोरे, समाजिक कार्यकर्ते शशिकांत कांबळे, मंदार जोशी, आनंद लंगर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर आदी उपस्थित होते. प्रसंगी चित्रपटाच्या पोस्टरचेही अनावरण करण्यात आले. सूत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले.
अभिनेते देव गील म्हणाले, “चित्रपट अनेक ठिकाणी बनतो. परंतु दिग्दर्शक आणि अभिनेते जोपर्यंत सहकार्य करत नाहीत तोपर्यंत कलाकारांना पुढे जाता येत नाही. मोठ्या कलाकारांनी उगवत्या कलाकारांना प्रोत्साहन द्यावे. नवीन कलाकारांना संधी देऊन त्यांच्यातील क्षमताना चालना द्यावी. या शहरातून चित्रपट क्षेत्राला अनेक दिग्गज कलाकार मिळाले आहेत. त्यात अजून भर पडेल यात शंका नाही.”
शशिकांत कांबळे म्हणाले, “कुटुंबातील कलहामुळे मुलांना आयुष्यभर आई किंवा वडील यांच्यापासून पोरके राहावे लागते. त्यांना पालकांच्या प्रेमाला मुकावे लागते. त्यामुळे पालकांनी थोडा समजुदारपणा दाखवत मुलांसाठी एकत्र राहायला पाहिजे आणि मुलाचे चांगले संगोपन केले पाहिजे. तरच कुटूंबपद्धती टिकून राहील. अशा संवेदनशील विषयावर ‘बटरफ्लाय’ बनत असून, त्यातून सामाजिक बांधिलकीही जोपासण्याचा प्रयत्न आहे.”