वो ना आयेंगे पलटकर जिन्हे लाख हम बुलाये…..
“देवदास “ही शरदचंद्र चॅटर्जी यांची अजरामर कलाकृती…!!!!यावरून १९२८मध्ये पहिला मूक पट निघाला ,त्यात “फणींद्रनाथ बर्मन” हे देवदास झाले होते.१९३१ मध्ये जेव्हा चित्रपट बोलू लागला ,तेव्हा १९३५मध्ये न्यू थिएटर्स च्या वतीने देवदास यावर हिंदी आणि बंगाली अशा दोन भाषेत चित्रपट निर्माण झाला.बंगालीत “बारुआ”यांनी तर हिंदीत सुप्रसिद्ध महान गायक “श्री कुंदनलाल सैगल” यांनी देवदासची भूमिका रंगविली..या चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळविली आणि सैगल याना खूप यश मिळवून दिले.बिमल रॉय यांनी न्यू थिएटर्स च्या देवदास चे छायाचित्रण केले होते.या कादंबरीतील सबळ व्यक्तिरेखा,वातावरणनिर्मिती,साहित्य मूल्य याची त्यांना भुरळ पडली होती.अखेरीस बिमल रॉय यांनी यावर चित्रपट करण्याचे ठरविले ,सचिनदेव बर्मन यांचे संगीत दिग्दर्शन लाभलेला हा चित्रपट म्हणजे अविस्मरणीय अशी अनुभूती देणारा ठरला…
नायक देवदास हा धनाढ्य जमीनदाराचा मुलगा…त्याची बालमैत्रिण “पार्वती” जी त्याचे पहिले प्रेम असते आणि त्याच्यावर नितांत निरपेक्ष प्रेम करणारी चंद्रमुखी ,जी कोठ्यावरील नर्तकी असते….हे या कथानकाचे तीन बिंदू आणि चुनीलाल जो तळीरामाची भूमिका बजावतो आणि देवदास ला चंद्रमुखी कडे नेतो ,हेही मुख्य पात्र…. प्रेमभंग झाल्याने भग्न हृदयी देवदास दारूच्या प्याल्यात आपले दु:ख विसरण्याचा प्रयत्न करतो…पार्वतीवर सच्चे प्रेम करणारा देवदास नियतीपुढे हतबल ठरतो… मदिरेच्या घोटात आपले दु:ख विसरण्याचा प्रयत्न करतो…..चंद्रमुखी त्याला सावरते, औषधोपचार करते, त्याची सेवा करते आणि मग येतो तिच्या
निरोपाचा प्रसंग…..देवदास चंद्रमुखीचा निरोप घेऊन निघतो…”फिर कब मिलना होगा… कौन जाने” ….हे त्याचे उत्तर…यातील लांबविलेल्या “कौन” चा उच्चार मनावर ठसतो….आयुष्याची आसक्ती उरलेली नसते…पुनः आपली भेट घडेल की नाही याबाबत साशंक असलेली चंद्रमुखी त्याला नमस्कार करते आणि पार्श्वभागी एक गीत ऐकू येते…..वो ना आएंगे पलटकर,जिन्हे लाख हम बुलाये…….!!!!!!!तेच आजचे गीत….!!!!
मुबारक बेगम यांचे हे गीत थेट काळजाला भिडते….खरच तो आता परतणार नाही हे माहीत असूनही त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली चंद्रमुखी वेड्या आशेवर जगत असते….भाबडेपणी त्याच्यावर प्रेम करत राहते….. साहिरजी….मनस्वी कवी असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा त्यांचे शब्द देतात !या शब्दांनी मनात दु:खाचा सागर उसळतो….!!!!
वो ना आएँगे पलट कर उन्हे लाख हम बुलायें
मेरी हसरतो से कह दो की ये ख्वाब भूल जायें
ही व्यथा आहे निरपेक्षपणे देवदासवर प्रेम करणाऱ्या ,नव्हे त्याच्या प्रेमासाठी आपला पेशा बंद करून एखाद्या जोगीणीप्रमाणे जीवन व्यतीत करणाऱ्या चंद्रमुखीची…..साहिर यांचे चपखल आणि हृदय विकल करणारे शब्द पहा…..कितीही वेळा बोलावले ,तरी आता तो परत नाही येणार….मेरी हसरतो से कह दो की ये ख्वाब भूल जाये…..”हसरत”कधीही पूर्ण न होणारी अशी इच्छा….देवदास हे चंद्रमुखीसाठी एक गोड स्वप्न असते ,जे सत्यात कधीच येणार नसते….!!!!!
अगर इस जहाँ का मलिक कही मिल सके तो पूछे
मिली कौन सी ख़ता पर हमे इस कदर सजायें
मिली कौन सी ख़ता पर हमे इस कदर सजायें
वो ना आएँगे पलट कर उन्हें लाख हम बुलायें
पराकोटीचे दु:ख सोसल्यावर आपल्या तोंडून येतेच की भेटला तो देव तर विचारीन की हे दु:ख माझ्याच पदरी का…???असे काय पाप घडले माझ्या हातून…..????नेमके हेच साहिरजींच्या लेखणीतून प्रकटले आहे….कौन सी खता हुई जीसकी सजा हमे मिल रही है…..पण काही प्रश्नांना उत्तरे नसतात……..!!!!!
तेरी बेरूख़ी के सदके
तेरी बेरूख़ी के सदके मेरी जिंदगी की खुशियाँ
तू अगर इसी मे खुश है तो खुशी से कर जफायें
तू अगर इसी मे खुश है तो खुशी से कर जफायें
वो ना आएँगे पलट कर उन्हे लाख हम बुलायें
मेरी हसरतो से कह दो की ये ख्वाब भूल जायें
देवदासवर नितांत प्रेम करणारी चंद्रमुखी…. त्याच्यावरून जीव ओवाळून टाकते….त्याच्या सुखासाठी जीवाचे रान करते…सदके….किती समर्पक शब्द….तिच्या जीवनाचा आनंद ती त्याच्यावरुन ओवाळून टाकते….त्याचे प्रेम आपण नाही हे माहीत असूनही तो सुखी व्हावा हीच मनी कामना धरते….पारोबरोबर त्याचा आनंद निघून गेला….हे माहीत असूनही त्याचे हे शुष्क वागणेही ती समजून घेते.भाषेची समृद्धी पहा…वफा ,जफा …परस्पर विरोधी शब्द….जर तुला सुखाशी उभा दावाच मांडायचाय ,तर तसे होऊदे ,कारण त्यात तुझे सुख आहे…पार्वती त त्याचा जीव गुंतलाय आणि आता जगातील सर्वोच्च सुखही त्याला आनंद देऊ शकत नाही हे चंद्रमुखी ओळखते….तरीही त्याच्यावर प्रेम करत राहते…..!!!!
खरं तर या गीताशी माझी ओळख घडवणारे श्री सुधीर मोघे….!!!!त्यांच्याच एका व्हीसीडीत हे गीत ऐकले आणि मनाला भिडले ते त्याचे शब्द आणि ते प्रकट करणारा स्वर….!!!!”मुबारक बेगम” यांच्या स्वराने या गीतास असीम उंची दिली आहे…गीतातील दर्द रसिकांपर्यंत त्यांनी अचूक पणे पोचविले आहे…त्यांची प्रामुख्याने “हमारी याद आयेगी” आणि “मुझको अपने गले लगा ले” ही गीते आपल्याला माहीत होती…पण राजस्थानातील या कोकिळेने हे गीतही तितक्याच उत्कटतेने सादर केले आहे…त्यांच्या स्वरात जात्याच असलेली दु:खाची किनार गीतातील भाव अधिक गडद करते….!!!!लाख लाख सलाम त्यांना…साहिरजींना आणि सचिनदेव बर्मन यांना…….!!!!