मुंबई-हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. बुधवारी सकाळी 7.30 वाजता हिंदूजा रुग्णालयात दिलीपकुमार यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत असल्या कारणाने जून महिन्यात रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं. यावेळी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटोदेखील शेअर करत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती. उपचारानंतर पाच दिवसांनी दिलीप कुमार यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.
मागील वर्षी दिलीप कुमार यांच्या दोन लहान भावांचे कोरोनामुळे निधन झाले होते. 21 ऑगस्ट रोजी 88 वर्षीय अस्लम यांचे तर 2 सप्टेंबर रोजी 90 वर्षीय अहसान यांची कोरोनामुळे प्राणज्योत मालवली होती. यामुळे सायरा बानो आणि दिलीप कुमार यांनी 11 ऑक्टोबर रोजी आपल्या लग्नाचा 54 वा वाढदिवस साजरा केला नव्हता.
पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी ‘मुगल-ए-आजम’, ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘राम और श्याम’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘मुगल-ए-आजम’ मधील सलीमप्रमाणेच ‘देवदास’ चित्रपटातील त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतो.
देवदास ही बंगाली लेखक शरतचंद्र यांची कादंबरी. बालमैत्रीण पारोवर प्रेम असूनही तिच्याशी लग्न न करता आलेला आणि त्यानंतर दारूच्या नशेत आकंठ बुडालेला, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पारोचा ध्यास घेतलेला ‘देवदास’ दिलीप कुमार यांनी ज्या तन्मयतेने रंगवला त्याने रसिकांच्या मनावर राज्य केले . १९९८ मध्ये आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
अखेरच्या क्षणापर्यंत सायरा बानो यांच्या आकंठ प्रेमाची साथ
दिलीपकुमार यांचा जन्म. ११ डिसेंबर १९२२ रोजी मध्ये पेशावर येथे.
हिंदी चित्रपटांमध्ये अभिनयाची तहज़ीब आणि तरक्की असलेले अभिनेते म्हणजे दिलीपकुमार.दिलीप कुमार यांना बॉलिवूडमधील ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखलं जायचे.
पेशावर मधील किस्सा खवानी बाजारात एका फळविक्रेत्या पठाण कुटुंबात जन्माला आलेल्या युसूफ खान यांनी कधीही हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. वडिलांनी व्यवसायाचे बस्तान बसविल्यानंतर इतर कुटुंबीयांसोबत मुंबईला आल्यावरही किशोरवयीन युसूफच्या तसे मनातही कधी आले नव्हते. उलट लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभे राहून बारा मुले, इतर नातेवाईक आणि पै-पाहुण्यांचे करता करता थकून गेलेल्या अम्मीचे कष्ट काही प्रमाणात कमी करता यावेत यासाठी लवकरात लवकर कमावता होणे याच एका उद्देशाने झपाटलेल्या युसूफने एकदा वडिलांशी उडालेला खटका मनाला लावून घेत तिरमिरीत घर सोडून थेट पुणे गाठले. तिथे लष्करी कॅन्टीनमध्ये मॅनेजरचा साहाय्यक म्हणून केलेल्या नोकरीने त्यांना आपणही पैसे कमवू शकतो, हा आत्मविश्वास मिळवून दिला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्करी कॅन्टीनचे व्यवस्थापन बदलले आणि युसूफ खान जमा केलेले पाच हजार रुपये घेऊन घरी परतले. नोकरी करावी की परंपरागत व्यवसाय, या द्विधा मन:स्थितीत दादर येथे एका परिचिताकडे निघालेल्या युसूफ खान यांना चर्चगेट स्थानकात डॉ. मसानी हे स्नेही भेटले. ख्यालीखुशालीच्या चौकशीत युसूफ नोकरीच्या शोधात असल्याचे समजल्यावर डॉ. मसानी यांनी त्यांना माहीम येथे सोबत येण्याची गळ घातली. युसूफही त्यांच्या आग्रहाखातर माहीम येथील बॉम्बे टॉकीज स्टुडिओत दाखल होऊन देविकाराणी समोर उभे राहिले. देविकाराणीने राजबिंडे व्यक्तिमत्त्व आणि उर्दूवरील प्रभुत्व या भांडवलावर युसूफ खान यांना महिना बाराशे रुपये पगारावर बॉम्बे टॉकीजच्या चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची ऑफर दिली. युसूफ आणि डॉ. मसानी या दोघांनाही हे अनपेक्षित होते. देविकाराणींच्या सूचनेवरूनच दिलीपकुमार या टोपण नावाने ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर त्यांचे १९४४ मध्ये पदार्पण झाले. मात्र हा चित्रपट अपयशी ठरला होता. त्यानंतर आलेला ‘मिलन’ हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आणि त्यानंतर त्यांनी कधीचं मागे वळून पहिलं नाही. दिलीप कुमार यांनी त्यांच्या सहा दशकाच्या अभिनय कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. त्यातील ‘अंदाज’, आन, ‘देवदास’, ‘आजाद’, ‘मुगल-ए-आजम’ और सामाजिक विषयावर आधारित चित्रपट ‘गंगा जमुना’ यांसारख्या चित्रपटात अभिनय केला. १९५७ मध्ये दिलीप कुमार व वैजयंती माला यांच्यावर चित्रित झालेल्या ‘माँग के साथ तुम्हारा मैने माँग लिया संसार…’ या गीतातील शब्दांनी तरुणाईला भारून टाकले होते. १९७६ मधील तिहेरी भूमिका असलेला ‘बैराग’ हा नायक म्हणून दिलीपकुमार यांचा अखेरचा चित्रपट. त्यानंतर पाच वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर राहिलेल्या दिलीपकुमार यांनी मनोज कुमार यांच्या ‘क्रांति’पासून चरित्र अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ‘शक्ति’, ‘विधाता’,’मजदूर’,’दुनिया’,’मशाल’, ‘कर्मा’, ‘सौदागर’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या उत्तुंग अभिनयाचे दर्शन घडवले. दिलीप कुमार यांनी १९९८ साली किला या चित्रपटात शेवटची भूमिका साकारली. भारत सरकारने त्यांना पद्मभुषण, दादासाहेब फाळके, पद्मविभूषण पुरस्काराने गौरविले. पाकिस्तान सरकारनेही त्यांना १९९७ साली सर्वोच्च नागरिक पुरस्कार निशान-ए-इम्तियाजनेही सन्मानित केले गेले. असे म्हणतात‘मुघल-ए-आझम’चे चित्रीकरण चालू असताना दिलीपकुमार आणि मधुबाला एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते,
सायरा बानूशी झालेला विवाह हे विधिलिखित होते. दिलीपकुमार आणि अभिनेत्री सायरा बानू यांचेही लग्न त्या काळी गाजले. कारण लग्नाच्या वेळी दिलीपकुमार पेक्षा सायरा बानूचे वय खूपच कमी होते.
दिलीप कुमार यांचं वैवाहिक आयुष्य
अभिनय सम्राटाच्या व्यक्तीगत आयुष्यातही काही समस्या होत्या. तराना सिनेमाचे शूटींग करताना दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. सात वर्षे ते एकमेकांसोबत होते. ‘मात्र नया दौर’ सिनेमच्या वेळी एका कोर्ट खटल्यामुळे हे नाते संपुष्टात आले. त्यानंतर वयाने २२ वर्षांनी लहान असणाऱ्या सायरा बानो यांच्याशी १९६६ मध्ये विवाह करून दिलीप कुमार यांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर त्यांनी हैदराबादच्या सॉलिसिटर आस्मा साहिबा यांच्याशीही १९८१ मध्ये लग्न केले होते. मात्र त्यांचा दुसरा विवाह फार काळ टिकला नाही. अवघ्या दोन वर्षातच हे दोघेही विभक्त झाले. मात्र सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचा सांभाळ केला आणि त्यांना साथ दिली.
दिलीप कुमार यांना मिळालेले पुरस्कार
दिलीप कुमार यांना मिळालेले पुरस्कार हादेखील चर्चेचा विषय आहे. कारण त्यांनी मिळवलेल्या पुरस्कारांची नोंद गिनिज बुकात झाली आहे. ८ फिल्मफेअर पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार (१९९१), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४), एनटीआर पुरस्कार (१९९७), पाकिस्तान सरकारतर्फे निशान-ए-इम्तियाझ पुरस्कार (१९९८), जीवनगौरवर पुरस्कार फिल्मफेअर, पद्म विभूषण पुरस्कार (२०१५), सीएनएन आयबीएन जीवन गौरव पुरस्कार (२००९) अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. फिल्मफेअर पुरस्कारात १९ वेळा नामांकने मिळवणारेही ते एकमेव अभिनेते होते.