मराठी सिनेमांचा ओघ हा पूर्वीपेक्षा काही प्रमाणात वाढला असून नवनवीन निर्माते, दिग्दर्शक, कलाकार ह्यांची संख्या ही त्याचप्रमाणे वाढत आहे. अभिनेता बनण्याचे स्वप्न हे प्रत्येकाचेच असते. परंतु मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण जर अधिक मेहनत घेतली तर आपल्याला यशापासून नक्कीच कोणी लांब ठेवू शकत नाही याचा खराखुरा प्रत्यय आला आहे तो अभिनेता कैलास वाघमारेला.आनंद सागर प्रॉडक्शनच्या विजयश्री पाटील यांची पहिली सिनेनिर्मिती असलेला, पांडुरंग जाधव यांचे दिग्दर्शन असलेल्या आगामी “मनातल्या उन्हात” सिनेमात जालना जिल्ह्यातील चांदई या छोट्याश्या गावात जन्मलेला कैलास वाघमारे आता अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज झाला आहे.
आपल्या मुलांच्या सर्व इच्छा, आकांक्षा आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई-वडील धडपडत असतात. मुले ही सुद्धा आपलीच स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पाठीमागे धावतात. आपल्या आई-वडिलांच्या इच्छेचा आणि त्यांच्या आकांक्षांचा ते विचार करतात का? त्यांची काही स्वप्ने आहेत का? याची जाणीव या मुलांना असते का? अशा काही मुद्द्यांभोवती या सिनेमाची कथा गुंफण्यात आली असून प्रत्येकाला आपलीशी वाटणारी अशी या सिनेमाची कथा असल्याचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनी सांगितले.
“मनातल्या उन्हात” सिनेमातील माझी भूमिका ही अत्यंत आव्हानात्मक असून वय वर्ष २० ते ६५ वर्षापर्यंतची व्यक्तिरेखा मी या सिनेमात साकारली आहे. सिनेमातील भाषेचा लहेजाही पूर्णपणे वेगळा असल्याने मी त्यासाठी वेगळी मेहनत घेतली. एका सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात अशा काही घटना या सातत्याने घडत जातात आणि त्या परिस्थितीशी तो कसा समोर जातो याचे उत्तम चित्रण “मनातल्या उन्हात” या सिनेमात तुम्हाला पाहता येईल.या सिनेमातील भूमिकेसाठी दिग्दर्शक पांडुरंग सरांनी माझी निवड केली त्यासाठी मी त्यांचा आभारी असल्याचे अभिनेता कैलास वाघमारे यांने सांगितले.
“मनातल्या उन्हात” या सिनेमाची कथा आयएएफ अधिकारी संजय पाटील यांची असून पटकथा विद्यासागर अध्यापक, पांडुरंग जाधव यांनी एकत्रितपणे लिहिली आहे तर संवाद विद्यासागर अध्यापक यांचे आहेत. या सिनेमात अभिनेते किशोर कदम, समीर धर्माधिकारी, नागेश भोसले, रुचिता जाधव, छाया कदम, मिताली जगताप, बालकलाकार हंसराज जगताप, मंथन पाटील आणि ओविशिखा पाटील यांच्या प्रमुख भूमिका आपल्याला पाहता येणार आहेत.या सिनेमात केवळ एक गाणे असून हे गीत विश्वराज जोशी यांनी लिहिले आहे. या गीताला राहुल मिश्रा यांचे सुमधुर संगीत लाभले असून सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आणि गायिका रंजना जाधव- माने यांच्या सुमधुर आवाजात ते रेकॉर्ड करण्यात आली आहे, तर पार्श्वसंगीत अश्विन श्रीनिवासन यांचे लाभले आहे.नागराज दिवाकर यांनी या सिनेमाचे उत्तम छायांकन केले असून निलेश नवनाथ गावंड यांनी संकलन केले आहे.
बॉलीवूडमधील अनेक दिग्गज मंडळीनी या सिनेमाचा ट्रेलर पाहून सिनेमाला सोशल साईट्सवर भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत.
तर असा हा मनातील स्वप्नांचा “मनातल्या उन्हात” सिनेमा येत्या २४ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.