पुणे : संशयित कोरोना रुग्णांच्या नमुने तपासण्याची प्रक्रिया वाढविण्यात आल्यामुळे येत्या काही दिवसांत बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होणार आहे. मजुरांच्या परराज्यात स्थलांतरासाठी तीनच राज्यांनी परवानगी दिलेली आहे. मजुरांच्या स्थलांतरासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज भासणार नाही. त्याऐवजी प्रशासनाकडूनच वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलिस आयुक्त के. वेंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांशी संवाद साधला.
डॉ. म्हैसेकर म्हणाले,’मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या तीन राज्यांनी मजुरांच्या स्थलांतरासाठी परवानगी दिली आहे. अन्य राज्याकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही. तसेच, युरोपसह अन्य देशांमधून काही भारतीय व्यक्ती मायदेशी परत येत आहेत. त्यापैकी 80 व्यक्ती पुण्यात येणार असून, त्यांना 14 दिवस संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.
पोलिस आयुक्त के. वेंकटेशम म्हणाले, परराज्यातील व्यक्तींना स्थलांतरित करण्याबाबत पोलिस उपायुक्त यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने राजस्थान, तेलंगणा, बिहारसह आणि काही राज्यांमध्ये बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. पुढील दहा दिवस खूप महत्त्वाचे असून, नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, पुढील दहा ते पंधरा दिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होणार आहे. मृत्यूच्या प्रमाणात घट आणणे आणि बाधित रुग्णांची संख्या कमी करणे ही प्रशासनासमोर दोन मोठी आव्हाने आहेत.
मजुरांच्या स्थलांतरासाठी लवकरच आणखी तीन विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. परराज्यात जाणाऱ्या नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज भासणार नाही. त्याऐवजी प्रशासनाकडून वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी कोणत्याही दवाखान्यात जाण्याची गरज नाही. पुणे शहरात 68 हजार मजुरांनी तसेच पिंपरी-चिंचवड येथून सुमारे 35 हजार मजुरांनी नाव नोंदणी केली आहे. लातूर, नांदेड, यवतमाळ, धुळे यासह विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनाही बसेसच्या मदतीने मूळ गावी पाठविण्यात येत आहे. शहरालगतच्या ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि जिल्हा परिषदेमार्फत पूर्ण लक्ष देण्यात येईल.
महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी संक्रमणशील भागात (कंटेनमेंट झोन) सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत दुकाने सुरू राहतील. तसेच अन्य ठिकाणी सकाळी 7 ते सायंकाळी सातपर्यंत दुकाने सुरू राहतील, असे स्पष्ट केले. संशयितांचे नमुने तपासण्यासाठी हॉटस्पॉट असलेल्या भागातच सुविधा सुरू करण्यात येत आहे. दररोज एक हजार नागरिकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या दुपटीने वाढण्याचा दर दहा दिवसांवरुन 11 दिवसांवर गेला आहे. त्यामुळे परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या प्रत्येक घरांमध्ये 15 दिवस पुरेल इतके अन्नधान्याचे किट देण्यात येत आहेत, असे गायकवाड यांनी सांगितले.