–हेमंत गोळे यांचे मत; मराठी विज्ञान परिषदेतर्फे सुमन मेहेंदळे स्मृती व्याख्यान
पुणे : आयझॅक असिमोव यांनी लिहिलेल्या कथा रंजक आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या होत्या. विसाव्या शतकात त्यांनी लिहिलेल्या कथांमध्ये जे वर्णन केले होते. ते आज एकविसाव्या शतकात आपण अनुभवतो आहोत. रोबोटिकसारख्या विषयांवर त्यांनी लिहिलेल्या कथा त्यावेळी काल्पनिक वाटत असाव्यात. आज मात्र, रोबोटिकचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विज्ञानकथांमुळे जनमानसात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजत असतो. त्यामुळे त्या कथा-कथनासारख्या कार्यक्रमांतून पोहोचवल्या पाहिजेत,” असे मत विज्ञानकथांचे अभ्यासक हेमंत गोळे यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाच्या वतीने सुमन मेहेंदळे स्मृती व्याख्यानात हेमंत गोळे यांनी विज्ञानकथा लेखक आयझॅक असिमोव यांच्या विज्ञानकथांचा प्रवास उलगडला. एस. एम. जोशी फाऊंडेशनच्या चर्चा सभागृहात झालेल्या या व्याख्यानात परिषदेचे माजी अध्यक्ष विनय र. र, कार्यवाह संजय मा.क, कार्यकारिणी सदस्य वसंत शिंदे, नीता शहा, डॉ. सुजाता बरगले, शशी भाटे आदी उपस्थित होते. यावेळी विज्ञानप्रेमींनी गोळे यांच्या रसाळ आणि ओघवत्या शैलीतून सादर केलेल्या रंगतदार विज्ञानकथांचा मनसोक्त आनंद घेतला. याप्रसंगी आयझॅक असिमोवयांच्या यंत्रमानव (रोबोट) विषयक तसेच अन्य विज्ञानकथांची सफर उपस्थितांना घेता आली.
हेमंत गोळे म्हणाले, ”विज्ञान हे कथा स्वरूपात असेल तर ते समजायला सोपे जाते. भविष्याचा वेध घेणाऱ्या विज्ञानकथांची मदत निनिराळे शोध, संशोधन, अभ्यास करणाऱ्या संशोधकांना होते. विज्ञानकथांच्या माध्यमातून विज्ञानाची आवड लागू शकते. आयझॅक असिमोव या लोकप्रिय विज्ञानकथा लेखकाचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांनी सर्वसामान्य लोकांना विज्ञान समजून देण्यासाठी विज्ञानकथा आणि कादंबरीचे लेखन केले. त्यांनी रोबोट अस्तित्वात येण्याआधीच रोबोट कथांचे लेखन केले होते. त्यांनी ५०० पेक्षा अधिक विज्ञानविषयक पुस्तके लिहिलेली आहेत. चाकोरीबध्द विचारातून मुक्त करण्याचे काम विज्ञानकथा करतात, असे असिमोव म्हणत. विज्ञानकथा लेखन झालेले आहेच. परंतु त्याचे कथा-कथन होत नाही. ते व्हायला हवे.” नीता शहा यांनी सूत्रसंचालन केले. वसंत शिंदे यांनी आभार मानले.