मुंबई- कोरोना उपयाययोजना संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वर्षा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बंदिस्त वातावरण टाळून आणि अधिकाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेत योग्य अंतर ठेवून ही बैठक घेण्यात आली.
सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना 24 तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
आज मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षावर कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊनमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे , त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य खरेदी करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्यात असेही यासंदर्भात झालेल्या बैठकीत ठरले.