पुणे
जगात आज सगळीकडे खूप अशांतता आहे. धर्माच्या नावाखाली विभाजन सुरू आहे. आपल्या धर्माव्यतिरिक्त इतर धर्मांचाही आदर करावा, अशी प्रत्येक धर्मात शिकवण आहे. जगाला येशू ख्रिस्तांच्या शिकवणीची गरज आहे. ज्यांनी त्यांचा छळ केला, त्यांनाही येशू ख्रिस्तांनी क्षमा केली. मानवतेचा संदेश त्यांनी दिला. आज जगाला गरज असणारे शांतिदूत येशू ख्रिस्त आहेत. असा सूर सर्वधर्मीय स्नेहमेळाव्यात उमटला.
डायोसिस ऑफ पुणे आणि स्वच्छंद यांच्यातर्फे ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त सर्वधर्मीय स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. बिशप हाउसमध्ये झालेल्या या चर्चमध्ये आमदार चेतन तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे डॉ. शमसुद्दीन तांबोळी, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. दत्तात्रय तापकीर, एस. एम. जोशी सोशल फाउंडेशनचे प्रा. सुभाष वारे, मुस्लिम विचारवंत अनिस चिश्ती, किशोर सरपोतदार, सत्यपाल सिंह, लेफ्टनंट जनरल डॉ. दुहान यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. मोहन जावळकर आणि प्रा. रवींद्र शाळू यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. या वेळी विद्यार्थिनींनी प्रार्थना गीत सादर केले.
पुणे धर्मप्रांताचे बिशप डॉ. थॉमस डाबरे म्हणाले, ‘येशू ख्रिस्ताने प्रेम, क्षमा आणि ऐक्याची शिकवण दिली. सध्या धर्म, संस्कृती, भाषा यातील भेदामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, एकमेकांमध्ये दुरावा वाढत आहे. आपल्या प्रत्येकाचा देव एक आहे. येशूही सर्वांचा असून, सर्व जण येशूचे आहेत. वैश्विक सहिष्णुता ही येशू ख्रिस्त यांची शिकवण आहे.’ तांबोळी म्हणाले, ‘सगळ्याच धर्मांनी एकत्र राहण्याची शिकवण दिली आहे. देशात शांतता आणि बंधुतेचा सर्वांनी अंगीकार केला पाहिजे. समाजात काही लोक कट्टरतेच्या नावाखाली इतरांचा द्वेष करतात. कोणताही धर्म कट्टरतेला मान्यता देत नाही. द्वेषाची भाषा कमी व्हावी, प्रेमाची भाषा वाढावी.’
धर्मात शांतता राहिल्याशिवाय देशात शांतता राहणार नाही. विविध धर्मातील लोकांमध्ये प्रेमभाव निर्माण होण्यासाठी सर्व धर्म परिचय करून घ्यायला हवा. त्यांची तत्त्वे समजून घ्यायला हवीत, तेव्हा आपल्या लक्षात येईल, की सर्व धर्मांची शिकवण आणि त्यांची तत्त्वे समान आहेत, असे मत डॉ. तापकीर यांनी व्यक्त केले. तुपे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. रवींद्र शाळू यांनी सूत्रसंचालन केले.