नागपूर- हिवाळी अधिवेशन कोणत्या ना कोणत्या कारणाने गाजत आहे. पहिला दिवस सावरकरांच्या मुद्द्यामुळे गाजला तर आज नागरिकत्व विधेयकामुळे विधिमंडळात गोंधळ सुरू आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यात नागरिकत्व विधेयक लागू होऊ नये अशी मागणी केली. तर त्या मागणीला भाजपने जोरदार विरोध केला.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी नागरिकत्व विधेयक “असंवैधानिक” असून राज्यात लागू होऊ नये. हा कायदा मुस्लिमविरोधी आहे. महाराष्ट्रामध्ये शांती हवी असेल तर कायदा लागू करू नका. जी गोष्ट घटनाबाह्य आहे. देशात आणि महाराष्ट्र मध्ये असंतोष सुरू आहे. या कायद्याची अंमलबजावणी करू नका,” अशी मागणी चव्हाणांनी केली. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी चव्हाणांच्या मागणीचा विरोध करुन तात्काळ राज्यात विधेयक लागू करण्याची मागणी केली.
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/562870521232657/
फडणवीस म्हणाले की, “देशातील सर्वोच्च अशा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये नागरिकत्व विधेयक मंजूर झाले आहे. त्यामुळे राज्य सरकार याला लागू करण्यासंबंधी निर्णय घेऊ शकत नाहीत.” भाजप नेते सुधीर मुनगंटीवर म्हणाले की, “विधानसभेतील सभासद देशाचे राष्ट्रपती, सभापती आणि लोकसभेच्या निर्णयावर संशय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे नागरिकत्व कायद्याला असंवैधानिक म्हणून त्याचा अपमान करण्याचा अधिकार त्यांना नाहीये.”
‘कोणत्याही कायद्यावर सभागृहात चर्चा केली जाऊ शकते’- जितेंद्र आव्हाड
“या सभागृहात यापूर्वी पोटा (प्रिव्हेंशन ऑफ टेररिझम अॅक्ट) यावर चर्चा झाली आहे. त्यामुळे नागरिकत्व विधेयकावरही चर्चा होऊ शकते. ‘हा कायदा माझ्या जातीविरोधात आहे. मी ज्या वंजारा समाजातून येतो, त्यातील अनेकजण मजुराची कामे करतात. अनेक महिलांना शेतातच मुले होतात. त्यांच्यापैकी अनेकांकडे कागदपत्र नसतात. त्यांनी काय करायचं?” असा प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी केला. काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनीही अशोक चव्हाणांच्या यांच्या या मागणीला पाठिंबा दर्शविला आणि म्हणाले की, “हा कायदा हिंदू किंवा मुस्लिमांबद्दल नाही, तर श्रीमंत आणि गरीबांबद्दल आहे. याची अंमलबजावणी केली जाऊ नये.” या सर्व गोंधळानंतर अध्यक्षांनी 10 मिनीटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.