सीमाकवी रविंद्र पाटील यांची माहिती
सासवड – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय कविसंमेलन बेळगाव येथे दि. १६ नोव्हेंबर रोजी होणार असून, प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन रंगणार आहे. अशी माहिती साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्याचे प्रदेशाध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांनी दिली.
बेळगाव येथे होणा-या विशेष कविसंमेलनाला सुप्रसिद्ध मराठी नाट्य चित्रपट अभिनेते वसंत अवसरीकर, साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व चित्रपट दिग्दर्शक शरद गोरे, शेतकरी कवी राजेंद्र सोनवणे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय बेळगाव जिल्ह्यातील कवींनी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
श्री यादव हे सध्या गाजत असलेल्या वारीच्या वाटेवर या महाकांदबरीचे लेखक असून, उन्हातला पाऊस, शिवधर्मगाथा, यादवकालीन भुलेश्वर, सुतसंस्कृती, घुंगुरकधा, मातकट, गुंठामंत्री, पोवाडा पुरुषोत्तमाचा, लेखणीची फुले, बालाघाटचा सिंह, आदी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. ढोलकीच्या तालावर सिनेमासाठी गीत लेखन केले असून, रणांगण सिनेमाचे संवाद व पटकथा त्यांची आहे. पत्रकार, कवी, लेखक, कांदबरीकार, इतिहास संशोधक, नाटककार, वक्ता, गीतकार असे अष्टपैलू साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे.
नवोदित कवि लेखकांना संधी देऊन त्यांच्या लेखनाला बळ देण्याचे काम साहित्य परिषदेच्या वतीने केले जाते. खेड्या पाड्यातील साहित्यिकांना संधी देऊन शेता शिवारातील साहित्याला न्याय देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचा उद्देश परिषदेचा आहे. असे श्री पाटील यांनी सांगितले.