पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) हे देशाच्या ऐक्याकरता उचललेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.
पुणे शहर भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा या विषयावरील कार्यशाळेत डॉ. सहस्रबुद्धे मार्गदर्शन करीत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते.
शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, खासदार गिरीश बापट, आमदार भिमराव तापकीर, मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, प्रदेश चिटणीस राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते धीरज घाटे, सरचिटणीस दीपक मिसाळ, गणेश घोष यांची प्रमुख उपस्थिती होती.
मानवतावादी दृष्टिकोनातून सीएएची निर्मिती करण्यात आली आहे. विरोधी पक्ष त्याबाबत जनतेमध्ये गैरसमज निर्माण करीत आहे. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन पत्रक वाटप, संपर्क या माध्यमांतू सोप्या भाषेत नागरिकांना या कायद्याची माहिती देऊन जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. असे मत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
आमदार माधुरी मिसाळ यांनी प्रास्ताविक, राजेश पांडे यांनी परिचय आणि गणेश घोष यांनी सूत्रसंचालन केले.