मुंबई:– राज्यात सत्ता स्थापनेवरून दिवसभर चर्चेनंतर अखेर शिवसेनेचे नेते राजभवनात पोहचून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासमोर सरकार स्थापनेचा दावा केला पण, काँग्रेसची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याने त्यांच्या पाठिंब्याचे पत्र सेनेला मिळाले नाही. त्यामुळे शिवसेनेलाही सत्ता स्थापन करता आली नाही. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही राज्यपालांना वेळ वाढून मागितली, परंतु त्यांनी वेळ दिली नाही. लवकरच पुढील भूमिका स्पष्ट करू, असे अदित्य ठाकरे म्हणाले.
राजभवनातून शिवसेनेचे नेते बाहेर आले. यात अदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई होते. त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अदित्य ठाकरे म्हणाले की, ”आपल्याला सर्वांना माहित आहे की काल संध्याकाळी आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी पत्र देत सत्तास्थापना करण्याबाबत विचारणा केली. त्यानंतर आम्ही इतर पक्षांशी बोलणी सुरु केली आहे. आमची वेळी 7.30 पर्यंत असल्याने आम्ही पावणेसात पर्यंत येथे पोहचलो. तसेच आम्ही सत्तास्थापन करु असं कळवलं आहे. इतर पक्षांचा पाठिंबा बाकी आहे. त्या पक्षांची चर्चा सुरु आहे. त्यांना निर्णय घेण्यासाठी 2 दिवस तरी लागणार आहे. आम्ही तसं राज्यपालांना कळवलं आहे. आम्ही सर्व पक्षांचा पाठिंबा घेऊन पुन्हा येऊ. महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.” असे अदित्य ठाकरे म्हणाले.
काँग्रेसने पाठिंब्याचे पत्र दिलेच नाही
दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र पाठवल्याची माहिती समोर आली होती. मात्र काँग्रेसने जे पत्र प्रसिद्ध केलं आहे, ते पत्र केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित चर्चा करुन उद्या निर्णय घेऊ अशा आशयाचे आहे. राज्यपालांना काँग्रेस-राष्ट्रवादीचे पत्रच मिळाले नाही.
तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सकाळपासून दोन महत्वपूर्ण बैठका घेतल्या. या बैठकीनंतर शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ताज लँड एंड्स हॉटेलमध्ये शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी फोनवर बातचीत करून अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली होती.