मुंबई – सत्ता स्थापनेवरून वाद सुरू असतानाच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्या 162 आमदारांच्या समर्थनाचे पत्र सोमवारी राज्यपालांना सुपूर्द केले. महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल लागल्यानंतर भाजपने स्वतः मान्य केले होते की त्यांच्याकडे बहुमत नाही. तरीही बहुमत नसताना सीएम पदाची शपथ घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीची पायमल्ली केली असे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सोबतच, फडणवीस यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. एकनाथ शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
व्हिप जारी करण्याचे अधिकार अजित पवारांनाच -भाजप
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने राज्यपालांना आमदारांच्या समर्थनाचे पत्र दिले तरी काहीच फरक पडणार नाही असे भाजपने सांगितले आहे. भाजपचे नेते आशीष शेलार यांनी सांगितल्याप्रमाणे, अजित पवार अजुनही राष्ट्रवादीच्या आमदारांचे गटनेते आहेत. त्यांना कायदेशीररित्या पदावरून काढण्यात आलेले नाही. त्यामुळे, आमदारांना व्हिप जारी करण्याचे अधिकार अजित पवारांनाच आहेत. तिन्ही पक्षांनी सोमवारी राज्यपालांना आमदारांच्या समर्थनाचे पत्र दिले तरी त्यावर अजित पवारांची स्वाक्षरी नाही. अशात त्यांचे पत्र वैध धरले जाऊ शकत नाही. असेही आशीष शेलार म्हणाले आहेत.